अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 15 मे, सकाळी 11.00
●कोमॉर्बिड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲक्शन प्लॅन● काल दिवसभरात जिह्यात 1726 जण बाधित● 60 वर्षापुढील कोरोनाबाधित मृत्यूमध्ये सातारा तालुका अग्रेसर● जिल्ह्यात आतापर्यंत 2021 जेष्ठांचा कोरोनामुळे मृत्यू● भरारी पथके लागली कामाला
सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरासह तालुक्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाही. लसीकरणासाठी ज्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याप्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढते आहे. प्रामुख्याने शांत समजल्या जाणाऱ्या भागातच प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जिल्ह्यातील तपासण्या शुक्रवारी 6020 झाल्या. त्या प्रमाणात पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण कमी झाले असून, काहीसा दिलासा आहे. रात्री बारा वाजता जाहीर झालेल्या अहवालात 1726 जण दिवसभरात कोरोना बाधित झाले आहेत. कोमॉबिड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. 60 वर्षापूढील मृत्यूमध्ये सातारा तालुका अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 60 वर्षापुढील 2021 ज्येष्ठांचा बळी गेलेला आहे. शासनाचे नियम पाळण्यासाठी गावोगावी तयार केलेल्या भरारी पथकांनी कामाला प्रारंभ केला आहे.
सातारा शहर हे जिल्ह्यातील कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत सर्वात अग्रभागी आहे. शहरातील बहुतांशी सर्वच पेठांमध्ये कोणी ना कोणी कोरोनामुळे बाधित आहेत. बहुतांशी अपार्टमेंटच्या खाली प्रतिबंधित क्षेत्राचे फ्लेक्स झळकत आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. एकामुळे सर्वच कुटुंब बाधित होण्याची संख्या मोठी असून त्यामुळे शहरातील डॉक्टरांच्या ओपीडी चोवीस तास सुरु आहेत. डॉक्टरांकडून सेवा देण्यामध्ये कुठेही कमी पडताना दिसत नाही. परंतु सातारा शहरातील बाधित होणाऱ्या नागरिकांना बाधा कशी, कुठे झाले हेच समजत नाही. सातारा पालिकेचे पथके शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात झालेल्या तपासण्या पहाता बाधित 1726 जण बाधित आढळून आले. त्या बाधितांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे. कालपर्यंत जिल्ह्यात बाधितांमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठांची संख्या 23 हजार 398 एवढी होती. तर 2021 ज्येष्ठांचा मृत्यू झाला होता. त्यात कालपर्यंत कंसात मृत्यू तर कंसाबाहेर बाधित संख्या : जावली तालुक्यात 1220 (89), कराड 3622 (341), खटाव 2085 (213), खंडाळा 1117 (68), कोरेगाव 2356 (208), महाबळेश्वर 511(23), माण 1409 (110), पाटण 1064 (86), फलटण 2569 (133), सातारा 5524 (587), वाई 1735 (163), इतर 186 (0).
मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन
मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ऍक्शन प्लॅन आणला असून कोमॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करण्यासाठी आणि त्यांची चाचणी करुन त्यांच्यामध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर लगेच उपचार करण्यासाठी पथके तयार केली आहेत. त्यांच्यावर जबाबदाऱया सोपवण्यात आल्या आहेत. हा सर्व्हे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरांमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे मृत्यूदर शुन्यावर येण्यास प्रयत्न होणार आहे.
शिक्षक करताहेत पोवाड्यातून कोरोनामुक्तीचा जागर
वाई तालुक्यामध्ये वाढत चालेला कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनय गौडा यांच्या सुचनेनुसार वाईचे गटविकास अधिकारी उदकुमार कुसूरकर यांनी भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्या पथकातील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, विस्तार अधिकारी विस्तारअधिकारी साईनाथ वाळेकर, विस्तार अधिकारी मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नागेवाडी शाळेचे उपशिक्षक शाहीर शरद यादव, चिंधवली शाळेचे मुख्याद्यापक अनिल जाधव, लाखानगर शाळेचे मुख्याद्यापक उमेश मोरे, वयगाव शाळेचे उपशिक्षक राजेंद्र नलावडे यांच्याकडून वाई तालुक्यात पोवाडय़ातून कोरोनामुक्तीचा जागर सुरु करण्यात आला आहे. त्यांनी आतापर्यंत यशवंतनगर, विराटनगर आदी ठिकाणी प्रबोधन केले आहे.
शनिवार पर्यंतबाधित….1726 मुक्त….3632 बळी….44
शनिवार पर्यंत तपासणी….634495 बाधित….134997 मुक्त…107904 मृत्यू…..3105 उपचारार्थ…23973