प्रतिनिधी / काणकोण
फार मोठी आशा आणि अपेक्षा धरून ऑर्किडसारख्या नव्या क्षेत्रात उतरलेल्या पणसुले-काणकोण येथील विशाल उल्हास देसाई या युवकाला मागच्या वर्षी कोरोना महामारीने दगा दिला, तर यंदा तौक्ते वादळाने दगा दिल्यामुळे त्याला 8 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे.
ऑर्किडसारख्या क्षेत्रात उतरण्यासाठी धाडस असावे लागते. या व्यवसायात उतरलेल्या देसाई यांनी आपला व्यवस्थित जम बसविला असतानाच मागच्या वर्षी कोविड महामारीने संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. मागच्या वर्षी काही लाखांचे नुकसान, बँकेच्या कर्जाचा फटका, कामगारांचे वेतन यातच वर्ष गेले. माजी कृषीमंत्री रमेश तवडकर यांचे प्रोत्साहन आणि पुढाकार यामुळे आपण या क्षेत्रात उतरलो आणि योग्य नियोजनाच्या बळावर आतापर्यंत जम बसवून होतो. या क्षेत्रात उतरणाऱयांना खूप मेहनत करावी लागती. संयमाने काम करावे लागते, असे मत देसाई यांनी व्यक्त केले. यंदा आपल्या फार्मवर चांगले पीक आले होते. मागच्या वर्षीचे नुकसान यंदा भरून काढण्याच्या उमेदीत असतानाच अकस्मात आलेल्या वादळाने संपूर्ण पिकाची नासाडी केली. आपल्या फार्मच्या शेडची हानी केली. होते नव्हते ते सर्व वाऱयाने आपल्याबरोबर नेले, असे देसाई यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मागच्या वर्षीचे नुकसान यंदा निश्चितच भरून काढता आले असत. मात्र नियतीपुढे कोणाचे काहीच चालेना, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.