सातारा / प्रतिनिधी :
कोरोना महामारी व आस्मानी, सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा रयत क्रांती संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील एक वर्षापासून राज्यातील नागरिक कोरोना व नैसर्गिक आपत्ती व बेजबाबदार राज्यसरकार मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच छोटे व्यवसायिक सुद्धा प्रचंड अडचणीत आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या कर्ज माफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफी करण्यात यावी व तात्काळ पिक कर्ज देण्यात यावे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा, कोरोना रुग्णांना सरसकट महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा. व पात्र रुग्णांचे पैसे ज्या हॉस्पिटलने घेतले असतील ते पैसे रुग्णांना परत मिळवण्याचे आदेश व्हावेत तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज माफी मिळावी, आदी मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाउन उठल्यानंतर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेकडून देण्यात आला.