134 जागांवर निर्विवाद विजय ः 15 वर्षांनंतर भाजप ‘एमसीडी’च्या सत्तेतून बाहेर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली महानगरपालिकेत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. आम आदमी पक्षाने (आप) 250 पैकी 134 जागा मिळवत महानगरपालिकेवर सत्ता काबीज केली. ‘आप’ने जिंकलेल्या जागा बहुमतापेक्षा 8 ने जास्त आहेत. दुसरीकडे भाजपने 104, काँग्रेसने 9 आणि अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे.
गेल्या 15 वर्षांपासून महानगरपालिकेत (एमसीडी) सत्ता असलेल्या भाजपला दिल्लीतील निवडणुकीत मोठा दणका बसला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपला 181 जागा मिळाल्या होत्या. तर, आता केवळ 104 जागांवरच विजय नोंदवता आल्याने भाजपला 77 जागांचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत ‘आप’ने सर्वोत्तम कामगिरी नोंदवत 126 हा जादुई आकडा लीलया पार केला. मात्र, एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेल्या अंदाजापेक्षा आम आदमी पक्षाला कमी जागा मिळाल्या आहेत. ‘एमसीडी’मध्ये आपच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे अभिनंदन केले. पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी जनतेने दिल्ली स्वच्छ करण्याची आणि भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी ‘आप’वर सोपवल्याचे स्पष्ट केले. ही जबाबदारी पेलताना केंद्र सरकारचेही सहकार्य आवश्यक असून पंतप्रधानांच्या आशीर्वादाचीही गरज असल्याचे ते पुढे म्हणाले.
आतिशी, निर्मला, शालिनी महापौरपदाच्या शर्यतीत
एमसीडीमध्ये ‘आप’ला बहुमत मिळताच आता महापौर कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधी चाचपणी करण्यास पक्षनेतृत्त्वाने सुरुवात केली आहे. त्यानुसार आतिशी मार्लेना यांचे नाव सध्या या शर्यतीत आघाडीवर आहे. मात्र, त्यासाठी त्यांना आमदारपद सोडावे लागणार आहे. आतिशी यांच्याशिवाय आप नेत्या निर्मला देवी यांनाही महापौर केले जाऊ शकते. निर्मला देवी या पक्षाच्या महिला शाखेच्या राज्य संयोजक आहेत. याशिवाय समुपदेशक कॅप्टन शालिनी सिंह यांचे नावही चर्चेत आहे. सध्या ही नावे चर्चेत आल्याने महापौरपदी ‘महिलाराज’ येण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
प्रामाणिकपणाचा विजय ः संजय सिंह
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे प्रामाणिक असून लोकांनी प्रामाणिकपणाला विजयी केल्याचे संजय सिंह म्हणाले. भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचे काम केजरीवाल यांनी केले. पक्षाचा हा मोठा विजय असून भविष्यात पक्षाच्या वाटचालीला यातून प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. दुसरीकडे केजरीवाल सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी आज दिल्लीतील जनतेने इतिहास रचला आहे. दिल्लीतून नवी सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.
दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन
दिल्लीच्या जनतेने मोठा संदेश दिला आहे. सकारात्मक राजकारण करा, नकारात्मक राजकारण करू नका. सकारात्मक राजकारण वाढले तर भारत जगातील नंबर एकचा देश बनेल. आपल्याला विकासाचे आणि सकारात्मकतेचे राजकारण करावे लागेल, असे मार्गदर्शन अरविंद केजरीवाल यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना केले आहे. तसेच त्यांनी दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन केले. दिल्लीच्या जनतेने संपूर्ण देशाला संदेश दिला आहे.
पंतप्रधानांचे आशीर्वाद हवेत ः केजरीवाल
दिल्ली सुरळीत करण्यासाठी सहकार्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याचीही आवश्यकता आहे. मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद मागतो. आता दिल्ली स्वच्छ करायची आहे. प्रत्येकाची कर्तव्ये निश्चित केली जातील. लहान मुले, महिला, वृद्ध आणि तरुणांनी शहराच्या विकासासाठी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे केजरीवाल म्हणाले.
ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी ः सिसोदिया
15 वर्षांच्या भ्रष्ट भाजप सरकारला हटवून केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारला बहुमत दिल्याबद्दल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या जनतेने आभार मानले आहेत. ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही विजयी उमेदवारांसह दिल्लीच्या जनेतेचे आभार मानले. तसेच उद्या गुजरातमध्येही चमत्कार पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.