संगमेश्वर-ओझरे हातीमवाडीत घडली होती घटना
रत्नागिरी प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील ओझरे हातीमवाडी खून खटल्यात वृध्दाचा खून झाल्याचेच न्यायालयापुढे सिद्ध न झाल्याने आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तुकाराम आत्माराम हातीम (७१, रा. खडीओझरे हातीमवाडी ता. संगमेश्वर) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध राजकीय वैमनस्यातून चुलत भाऊ राजाराम हातीम याला दिलेल्या शीतपेयाच्या बाटलीमध्ये विषारी द्रव्य मिसळून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांनी या खटल्याचा निकाल दिला. आरोपीच्यावतीने ॲड. संकेत घाग यांनी न्यायालयापुढे युक्तिवाद केला. खटल्यातील माहितीनुसार, २१ डिसेंबर २०१७ रोजी खडीओझरे हातीमवाडी येथे रात्री ८ च्या सुमारास श्रीपत’ हातीम याच्या घराजवळ राजाराम भिवा हातीम (६०), त्याची पत्नी सुंदरा, दत्ताराम सालम व श्रीपत हातीम हे गप्पा मारत बसले होते. यावेळी तुकाराम हातीमने राजाराम यांना शीतपेयाची बाटली पिण्यासाठी दिली होती. रात्रीच्या सुमारास राजाराम याने शितपेय प्राशन केले असता त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. उपचारासाठी राजाराम यांना जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले असता २२ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ५ वा. राजाराम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस तपासात
राजाराम यांचा मृत्यू विषारी द्रव्य प्राशन केल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अज्ञात कारणावरून राजाराम यांनी विषप्राशन केल्याचे पोलिसांकडून नोंदवण्यात आले.
पोलिसांकडून पुढील तपासात ग्रामपंचायत निवडणुकीत राजारामविरूद्ध तुकाराम यांनी फॉर्म भरला होता. हा फॉर्म ग्रामस्थांच्या दबावामुळे तुकारामला मागे घ्यावा लागला होता. याचा राग तुकाराम याच्या मनात धुमसत होता. यातूनच तुकाराम याने शीतपेयाच्या बाटलीत किटकनाशक मिसळून राजाराम याला दिले. हे शीतपेय प्यायल्याने राजाराम यांचा मृत्यू झाला, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तुकाराम याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२ व २०१ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र खूनाचा गुन्हा १३ डिसेंबर २०१९ म्हणजेच घटनेच्या २ वर्षानंतर दाखल करण्यात आला.
गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तुकाराम याच्याविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. खटल्यादरम्यान आरोपीच्यावतीने युक्तिवाद करताना ॲड. संकेत घाग यांनी सांगितले की विषप्राशन केल्यानंतर शरीराच्या अंतर्गत भागातजे परिणाम होतात, त्यातले कोणतेही परिणाम झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आढळले नाही. राजाराम यांचा मृत्यू हा आत्महत्या किंवा अपघात नसून सदोष मनुष्यवध आहे, ही बाब सरकारपक्ष न्यायालयापुढे सिद्ध करू शकलेला नाही. तथाकथित घटना व साक्षीदारांची कथने ही आरोपीने राजाराम याला बोलावून घेवून शीतपेय दिले, हा प्रसंग रचलेला व खोटा आहे. मृत झालेल्या राजारामने दिलेला मृत्यूपूर्व जबाब हा खोटा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रथम पुरवण्यात आलेली माहिती व पोलिसांचा २२ डिसेंबर २०१७ व २ जानेवारी २०१८ या कालखंडातील रेकॉर्ड केसशी सुसंगत नाही. शीतपेयाची बाटली जप्त करताना सील करण्यात आली नव्हती. तसेच संबंधित कंपनीशी पोलिसांनी जो पत्रव्यवहार केला, त्यात वादाविषयक शीतपेय व उत्पादन तारखेचा शीतपेयाचा साठा यांची तपासणी झालेली नाही. तसेच आरोपीकडे कोणत्याही प्रकारचे संबंधित विषारी द्रव्य अथवा शीतपेय ताब्यात होते. हे सरकार पक्ष न्यायालयापुढे सिद्ध करू शकला नाही, असे ॲड. संकेत घाग यांनी न्यायालयापुढे सांगितले.
खून झाल्याबाबतच ठोस पुरावा नाही
न्यायालयाने आपल्या निकालपत्रात सांगितले की, आरोपीविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यास २ वर्षांचा विलंब लागला. हा विलंब नेमका कशामुळे लागला, हे सरकारपक्ष न्यायालयापुढे सांगू शकला नाही. सुरूवातीला राजाराम यांने अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. आरोपी याने शितपेयाच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळून ती राजाराम याला दिली, या बाबत कोणताही ठोस पुरावा सरकार पक्ष न्यायालयापुढे ठेवू शकला नाही. त्यामुळे राजाराम यांचा खून झाला, या बाबत कोणताही ठोस पुरावा दिसून येत नाही, असे नोंदवत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.