संतोष पाटील,कोल्हापूर
Ajit Pawar News : प्रशासनावर कमालीचा वकूब असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी उत्तरदायित्व सभेच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.पुणे,पिंपरी-चिंचवड,बारामतीचा स्वप्नवत विकास करणाऱ्या मंत्री पवार यांच्यावर कोल्हापूरच्या विकासाचं उत्तरदायित्व घेण्याची वेळ आली आहे.कारण कोल्हापूरचं सर्वपक्षीय नेतृत्व सर्वांगिण विकास करण्यात खुजं ठरल्याचे कटू वास्तव आहे.अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषण,अंबाबाई विकास आराखडा,खंडपीठ, उड्डाण पुलासह चकचकीत रस्ते,हद्दवाढ,कचऱ्याचे निराकरण हे प्रश्न कागदावरच आहेत.त्याच त्या प्रश्नांचा इतका काथ्याकुट झाला आहे की आता पुन्हा माध्यमातून मांडणे हा सुध्दा चेष्टेचा विषय बनला आहे.निवडणूक आणि राजकीय इर्षेपलीकडे जाऊन कोल्हापूरचा सर्वांगीण विकास आणि रखडलेल्या योजनांसह नवीन प्रकल्पासाठी तळमळ आणि प्रयत्न करणारे नेतृत्व कोल्हापूरला लाभले नाही,ही कोल्हापूरच्या विकासाच स्वप्न मंत्री पवार यांच्यानिमित्ताने पूर्ण व्हावे,ही सर्वसामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे.
हद्दवाढीने तर हद्दच केली
हद्दवाढ आणि विरोधाच्या बाजूने निवडणुका जवळ आल्या की वातावरण तापवले जाते. याउलट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे,पिंपरी-चिंचवड शहराची दहा-दहा वेळा हद्दवाढ झाली.तेथील आजूबाजूची गावे स्वत:हून शहरात येण्यास उत्सुक आहेत.कोल्हापुरात नेमकं उलट चित्र आहे.दादांची होमपीच असलेल्या बारामतीचा विकास तर दुबई शहराशी तुलना करणारे आहे.कोल्हापूरच्या हद्दवाढीला पर्याय म्हणून पुढे आलेलं प्राधिकरण म्हणजे निव्वळ अडवणूक आहे.कोल्हापूर हद्दवाढप्रश्नी पवार टच् मिळाला तरच हा प्रश्न सहज निकाली निघेल.
पाईपलाईनची राजकीय परिक्रमा
अजित पवार दहा वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री असताना सुरू झालेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पूर्ततेची तारीख पे तारीख सुरू आहे.ठेकेदाराला साडेपाच कोटींचा दंड आणि सात वर्षानंतरही 80 टक्केच काम पूर्ण झाले हेच योजनेचे फलीत होते.योजना राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे कासवछाप बनली आहे.दरम्यान,योजनेने दादांच्या साक्षीनेच राज्यात तीन वेळा सत्तांतराचा अनुभव घेतला.
महापूराचं नियोजन कोलमडेलेलं
पुणे लगतच्या मुळा-मुठा नदीमुळे शहराला महापुराच धोका निर्माण झाला नाही.या नद्यांची खोली-रुंदी गरजेनुसार वाढवली आहे.त्यांचे पात्र इतके रुंद आहे की,कितीही पाणी आले तरी नागरीवस्तीत येत नाही,याचा अभ्यास करुन तरतूद केली आहे.याउलट कोल्हापूरच्या पंचगंगा नदी पात्रात बहुतांश ठिकाणी भराव पडला आहे.तसेच शहरातील जयंती नाल्यासह लहान-मोठे नाले गाळाने भरले आहेत.शहरात नागरीवस्तीत पुराचे पाणी येण्याचं हे प्रमुख कारण आहे.याचा विचार करुन कृती आराखडा कधी होणार?आला महापूर की कर स्थलांतर,अशी शहरवासीयांची मानसिकता करुन ठेवली आहे.महापूर येतच राहणार परंतू या प्रश्नातून शाश्वत तोडगा कधी निघणार?
कुठे मुळा-मुठा,कुठे पंचगंगा?
पुणे शहरालगत असूनही मुळा-मुठा नदी पंचगंगा नदीच्या तुलनेत कमी प्रदुषीत आहे.मागील पंधरा वर्षात शेकडो कोटी रुपयांचा निधीच्या खर्चासह ‘नमो:गंगे:’च्या धर्तीवर ‘नमो: पंचगंगा’ उपक्रम करुनही पंचगंगा मैलीच आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर शहरातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सांडपाणी नदीत सोडले जाते.यामुळे नदी काठावरील आठ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे.पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी केंद्र-राज्य सरकारनेच आराखडा बनवून ठोस निधीची तरतूद करत नदी निर्मळ करण्याची गरज आहे.
खंडपीठ :पुणे की कोल्हापूर?
तीन दशकं कोल्हापूरकर खंडपीसाठी लढत आहेत.कोल्हापूर,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी व सोलापूर जिह्यासाठीचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे ही मागणी आहे.तत्पूर्वी आठवड्यातून एकदा सर्किट बेंच स्थापण्याची मागणी पुढे आली.खंडपीठासाठी शेंडापार्कात जागा निश्चित करण्याचे ठरले.प्रत्यक्षात खंडपीठाच्या परवानगीचे सोपस्कार लटकल्याने सर्किटबेंचसह त्यासाठीच्या पायाभूत सुविधांची उभारणी कागदावरच राहिली.खंडपीठ पुणे की कोल्हापूर या जुन्या वादात अजित पवार यांचा शब्द अंतिम ठरणारा आहे.अजित पवारांनी पुण्यासाठी भरपूरक केले आता खंडपीठाच्या बाबतीत कोल्हापुरच्या पारड्यात वजन टाकून उत्तरदायित्व पूर्ण करावे.
शाहू स्मारक जैसे थे…
शाहू मिलच्या 27 एकर जागेवर भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन आघाडी शासनापासून सुरु आहे.आघाडी शासनाने आश्वासनांची बोळवण केली असा आरोप भाजपने केला.आता दादा भाजपचे साथीदार आहेत.दादांच्या साक्षीने आघाडीच्या काळात तीन वेळा सादरीकरण झाले.युती शासनकाळात पहिल्या टप्यातील 69 कोटी रुपयांच्या कामाचे सादरीकरण होऊनही स्मारकाचे काम रखडले आहे.प्रशासनाने शाहू शताब्दी वर्ष सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणात घालवले.शताब्दी वर्षात शाहूमिल जागेच्या विकासासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे धारीष्ठही प्रशासन आणि राजकीय स्तरावर झाले नाही.याउलट पुणे-बारामती शहरातील विकासनिधी कुठे खर्च करायचा हा प्रश्न प्रशासनाला असतो.
आराखड्याला मुहूर्त कधी?
राज्य शासनाने अंबाबाई विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात 255 कोटी रुपये मंजूर केले.आराखडा पूर्णत्वास गेला नाही.बारा वर्षापूवी अजित पवार अर्थमंत्री होते तेव्हा या आराखड्यासाठी दहा कोटींची तरतूद केली होती.ती हवेतच विरली.आता शहरात भाविकांची संख्या वाढत असताना पायाभूत सुविधांची वाणवा आहे.भक्त निवास, पार्किंग,वाहतूक कोंडी याचा सामना पर्यटक,भाविकांना करावा लागत आहे.
टोल गेला झोल राहिला
हलक्या पावसातही शहरातील अनेक रस्त्यात अनेक ठिकाणी पाणी साचते.आयआरबीने केलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वर्षाला किमान 25 कोटींची गरज आहे.महापालिकेने मागणी करुनही निधी मिळत नाही.आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दादांच्या हातात आहेत.शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नियमित निधीची तरतूद व्हावी.
कचरा प्रश्न जीवावर
कोल्हापुरातील कचरा प्रश्न निराळाच आहे.प्रशस्त जागा आहे.मात्र कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने निराकरण करण्यासाठी राज्य शासन हात हाखडता घेत असल्याचे वास्तव आहे.शहरात रोज तयार होणारा सुमारे 200 टन कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न आहे.वीज प्रकल्पाने जीव टाकला आहे.सार्वजनिक स्वच्छतेसाठी आग्रही असलेल्या अजितदादांनी कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करुन निराकरण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
टक्केवारीत अडकले रस्ते
दोन वर्षांपूर्वी ना.पवार अर्थमंत्री असताना कोल्हापूरला 25 कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी आला.पहिल्या पावसात यातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत.आता सत्तांतरानंतर पुन्हा अर्थमंत्रीपदाची धुरा पवारांकडेच आहे.योगायोगाने शहरासाठी पुन्हा 100 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.मागील रस्त्याचे जे व्हायचे ते झाले.या नव्या रस्त्यांनी तग धरावा.दादांनी पुण्यात चार-चार वेळा उड्डाण पुलं बांधून पाडली अन् नवीन बांधली.कोल्हापूरला बाह्य रस्त्यासह किमान सहा उड्डाणपुलं झाली तरच वाहतुकीचा ताण सुसह्य होईल.
हीच वेळ पालकत्वाची : स्थानिक नेतृत्व खुजे..?
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा सामाजिक वारसा,ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि नैसर्गिक विपुलता कोल्हापुरात असे सर्व काही आहे.तरीही येथून राज्याचे नेतृत्व करावे असे नेतृत्व घडले नाही.मोजके प्रसंग वगळता येथील नेतृत्वांनी कधी संपूर्ण जिल्हा नजरेपुढे ठेवून विकासाची संकल्पना पुढे आणलीच नाही.स्थानिक नेते मंडळी राजकीय स्पर्धेमुळे मतदारसंघातच अडकून पडले आहेत.पायात पाय घालण्याच्या राजकारणामुळे येथील नेत्यांमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची धमक असूनही ते खुजे ठरले.यामुळेच दादांनी कोल्हापूरचे पालकत्व स्वीकारण्याची ही योग्य वेळ आहे.
दादा आणि कोल्हापूर ऋणानुबंध
अजित पवार कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक कोल्हापुरात आहेत.मोठ्या पवारांचे आजोळ कोल्हापूरचेच आहे.अजित पवार हे महाविद्यालयिन शिक्षणासाठी काही काळ कोल्हापुरात होते.पुणे-सातारानंतर कोल्हापूर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.पवारांचे ऋणानुबंध कोल्हापूरशी आहेत.हे नाते विकासाच्या सेतूने अधिक घट्ट व्हावेत.