वृत्तसंस्था/ मुंबई
भारतामध्ये पहिल्यांदाच महिलांची टी-20 आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेला येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे. नव्या मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीचा सामना खेळवला जात आहे. या स्पर्धेमध्ये पाच संघांचा समावेश आहे. दरम्यान या संघांच्या फ्रांचायझीनी भारतीय महिला क्रिकेटपटूंना कर्णधारपदासाठी वगळून विदेशी खेळाडूंना कप्तानपदाची संधी दिल्याबद्दल भारताची माजी कर्णधार अंजूम चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण पाच संघांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या दोन संघांनी मात्र भारतीय महिला क्रिकेटपटूंना कप्तानपदाची संधी दिल्याबद्दल अंजूम चोप्राने समाधान व्यक्त केले आहे. हरमनप्रित कौर मुंबई इडियन्स संघाची तर स्मृती मंदाना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाची कर्णधार आहे. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंटस् आणि युपी वॉरियर्स या संघांच्या फ्रांचायझीनी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंना कर्णधार बनवले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लेनिंग, गुजरात जायंटस्चे नेतृत्व बेथ मुनी तर युपी वॉरियरचे नेतृत्व अॅलिसा हिली करीत आहे. महिलांसाठी भारतात ही पहिलीच लिग टी-20 स्पर्धा होत असून भारतीय वातावरणाची ओळख विदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय क्रिकेटपटूंना अधिक असल्याने त्यांना कर्णधार करणे योग्य ठरले असते असेही चोप्राने म्हटले आहे. दीप्ती शर्माकडे कर्णधारपदाचे गुण निश्चित असल्याचे जाणवते. गेल्या वेळी झालेल्या महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेत दीप्ती शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. आतापर्यंत सहावेळा आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये भारताच्या तुलनेत अधिक अनुभवी खेळाडू असल्याचे चोप्राने म्हटले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा अधिक अनुभव असल्याचे चोप्राने म्हटले आहे. भारताची माजी कर्णधार 45 वर्षीय अंजुम चोप्रा आता क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत असते.