राज्यपाल रवि यांचा पाकिस्तानला इशारा ः
वृत्तसंस्था/ कोची
भारतात दहशतवादी कारवाया वाढवू पाहणाऱया पाकिस्तानला तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांनी इशारा दिला आहे. जो कुणी बंदुकीचा वापर करेल, त्याला प्रत्युत्तर बंदुकीनेच दिले जावे असे रवि यांनी केरळच्या कोची येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱया कारवायांबद्दल झिरो टॉलरन्सच्या धोरणाचा पुनरुच्चार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वत देशाची अंतर्गत सुरक्षा मागली सरकारांच्या तुलनेत अधिक मजबूत असल्याचे त्यांचे मत आहे.
देशाची एकता तसेच सार्वभौमत्वाच्या विरोधात असलेल्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली जाऊ नये. आठ वर्षांमध्ये कुठल्याही सशस्त्र गटासोबत शरणागती पत्करण्याच्या मुद्दय़ाव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. 26/11 च्या मुंबई हल्ल्यांवरून रवि यांनी तत्कालीन संपुआ सरकारला लक्ष्य केले आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर टीका केली आहे.
शत्रू का मित्र हे स्पष्ट व्हावे
2008 मध्ये मूठभर दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला तेव्हा पूर्ण देशाला धक्का बसला होता. या हल्ल्यात 10 दहशतवाद्यांनी 12 ठिकाणी गोळीबार केला आणि यात सुमारे 174 लोक मारले गेले, 300 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या 9 महिन्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पाकिस्तानी पंतप्रधान यांच्यात एक संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी झाली आणि यात दोन्ही देश दहशतवादाने ग्रस्त असल्याचे नमूद होते. पाकिस्तान आमचा मित्र आहे का शत्रू हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही एअर स्ट्राइक करत बालाकोटमध्ये पाकिस्तानला धडा शिकविला. जर तुम्ही दहशतवादाला बळ पुरविल्यास, थारा दिल्यास तुम्हाला याची किंमत फेडावी लागेल असा स्पष्ट संदेश यामागे होता असे राज्यपाल रवि यांनी म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर
राज्यपाल रवि यांनी स्वतःच्या भाषणादरम्यान 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. पुलवामा येथे आमच्या जवानांवर हल्ले करण्यात आले तेव्हा आमच्या वायुदलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. बालाकोटमध्ये आम्ही 300 हून अधिक दहशतवाद्यांना लक्ष्य केले आणि हे सर्व पंतप्रधान मोदींच्या कठोर निर्णयांमुळे शक्य झाल्याचे रवि म्हणाले. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आता भारताची अंतर्गत सुरक्षा अधिक चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.