वृत्तसंस्था/ येरेवान
तुर्किये, अझरबैजान आणि पाकिस्तानच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आर्मेनियाने आता मदत करण्यासाठी भारताला साद घातली आहे. आर्मेनियाच्या एका संरक्षण शिष्टमंडळाने भारताचा दौरा करत लढाऊ ड्रोन तसेच अन्य शस्त्रास्त्रखरेदीच्या शक्यतांवर चर्चा केली आहे. या शिष्टमंडळाने प्रामुख्याने ड्रोन विमानांची मागणी केली आहे.
नागोर्नो-काराबाखमध्ये अझरबैजानकडून पराभव पत्करावा लागल्यावर आर्मेनियाने आता भारताला मदत करण्याचे आवाहन केले आहे. काराबाख येथील युद्धात तुर्कियेकडून मिळविलेल्या ‘टीबी-2’ ड्रोनच्या मदतीने अझरबैजानने आर्मेनियाच्या सैन्याचे मोठे नुकसान घडविले होते. या ड्रोन्सनी आर्मेनियाच्या तोफा, रणगाडे आणि अन्य घातक शस्त्रास्त्रांना नष्ट केले होते. रशियाच्या हस्तक्षेपानंतर अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात एक करार झाला होता. परंतु आता रशिया युक्रेनच्या युद्धात अडकून पडल्याने अझरबैजानने पुन्हा स्वतःचा दबाव वाढविला आहे.
भारत आणि आर्मेनिया दीर्घ कालीन सैन्य सहकार्याबद्दल विचारविनिमय करत आहेत. यात संरक्षण आणि सैन्य तांत्रिक सहकार्यावर भर असल्याची माहिती भारतीय विदेश मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे. तुर्कियेविरोधात संतुलन साधणारा देश म्हणून आर्मेनिया भारतासाठी महत्त्वाचा आहे. तुर्किये हा देश काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची बाजू उचलून धरणारा देश आहे. तर तुर्किये आणि अझरबैजानच्या आघाडीला पाकिस्तानही पूर्ण मदत करतोय. काराबाख येथील युद्धात पाकिस्तानने उघडपणे अझरबैजान अन् तुर्कियेच्या आघाडीला साथ दिली होती. याच्या उलट भारताने शांतता कराराचे समर्थन केले होते.