ईडीकडून कारवाई
वृत्तसंस्था/ कोलकाता
ईडीने पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सुजय कृष्ण भद्र यांना मंगळवारी रात्री अटक केल्याची माहिती अधिकाऱ्याने बुधवारी दिली आहे. सुजय कृष्ण भद्र यांना 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. चौकशीदरम्यान भद्र यांनी सहकार्य करणे टाळले, घोटाळ्याशी संबंधित विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांनी नकार दिल्याचे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. तत्पूर्वी भद्र हे सीबीआयसमोर हजर राहिले होते. या घोटाळ्याची समांतर चौकशी सीबीआय देखील करत आहे.
तृणमूल काँग्रेसने या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, परंतु ही कारवाई राज्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार बायरन विश्वास यांच्या तृणमूल प्रवेशापासून लक्ष विचलित करण्यासाठी केली गेली असावा असा संशय पक्षाने व्यक्त केला आहे.
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची कारवाई आहे. घोटाळ्याचा सूत्रधार अन् सर्वात मोठ्या लाभार्थींना पकडण्यास तपास यंत्रणा यशस्वी ठरत आहेत. भ्रष्टाचारात सामील तृणमूल नेत्यांची यादी मोठी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूलचे वरिष्ठ नेते गजाआड पोहोचण्याचा दिवस आता दूर नसल्याची टिप्पणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.