लिव्ह इन रिलेशनशिप’वर अलाहाबाद उच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपवर नुकतेच कठोर शब्दात भाष्य केले. वेगवेगळ्या स्थितीनुसार प्राण्यांप्रमाणे जोडीदार बदलण्याची संकल्पना म्हणजे असंस्कृतपणा असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. वेळोवेळी जोडीदार बदलण्याची ही पद्धत सुसंस्कृत आणि निरोगी समाजाचे लक्षण असू शकत नाही. लग्नात जी सुरक्षितता, सामाजिक मान्यता आणि स्थिरता मिळते ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये कधीच मिळू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’शी संबंधित एका प्रकरणावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सध्या सुनावणी चालू आहे. या प्रकरणातील व्यक्तीला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती सिद्धार्थ यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने संबंधिताला खडे बोल सुनावले. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये नातेसंबंध जोडताना सुरुवातीला फार आनंदी-आनंद असतो. मात्र, काळाच्या ओघात या नात्याला सामाजिक मान्यता नसल्याचे दोघांच्याही लक्षात येते. त्यामुळे तऊणांमध्ये निराशा वाढू लागली आहे. अशी अनेक उदाहरणे सध्या घडत असून त्याबाबत वेळीच सावध व्हायला हवे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
लिव्ह-इनमध्ये बनली गर्भवती
सहारनपूरचा रहिवासी असलेल्या अदनानवर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने बलात्काराचा आरोप केला होता. दोघेही वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि याचदरम्यान मुलगी गरोदर राहिली. याबाबत न्यायमूर्ती म्हणाले की, देशातील विवाह संस्था नष्ट करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. अनेक तथाकथित देशांप्रमाणे आपणही त्या मार्गावर जात असून भविष्यात आपल्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
पती-पत्नी असे नाते न जोडता मुक्तपणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे हे पुरोगामी समाजाचे लक्षण असल्याचे बोलले जात आहे. तऊण वर्ग अशा गोष्टींकडे आकर्षित होतो, पण भविष्यात त्याचे काय परिणाम होतील याची त्यांना कल्पना नसते. ज्या व्यक्तीचे स्वत:च्या कुटुंबाशी चांगले संबंध नाहीत तो देशाच्या प्रगतीत हातभार लावू शकत नाही. अशा स्त्री/पुऊषाला कोणताही आधार नसतो. एका नात्यातून दुसऱ्या नात्यात उडी मारल्याने जीवनात समाधान मिळत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ नातेसंबंधातून जन्माला आलेल्या मुलांनाही मोठी झाल्यावर समस्यांना सामोरे जावे लागते. पालक विभक्त झाल्यावर मुले समाजावर ओझे बनतात. अशा नातेसंबंधातून मूल जन्माला आले, तर त्याचे इतरही अनेक वाईट परिणाम होतात, ज्यांचे तपशीलवार वर्णन करण्याची गरज नाही. अशी प्रकरणे न्यायालयात येत असतात, असेही न्यायमूर्ती म्हणाले. याशिवाय टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि चित्रपट पाहून तऊण लिव्ह-इन रिलेशनशिपकडे आकर्षित होतात, असेही सांगण्यात आले. चित्रपट आणि टीव्ही मालिका विवाहबाह्य संबंध वाढवण्याचे आणि समाजात असंस्कृतपणा पसरवण्याचे काम करत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.