सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
न्यायमूर्ती यु. यु. लळीत यांनी शनिवारी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश बनले आहेत. नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. शनिवारी झालेल्या शपथविधी सोहळय़ास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
न्या. यु. यु. लळीत यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी सोलापूरमध्ये झाला होता. त्यांचे कुटुंबीय मूळचे सिंधुदुर्ग जिह्यातील आहे. लळीत यांच्या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. त्यांचे आजोबा रंगनाथ लळीत हे स्वातंत्र्यापूर्वी सोलापुरात वकील होते. तर त्यांचे 90 वषीय वडील उमेश रंगनाथ लळीत हेदेखील व्यावसायिक वकील आहेत. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. याशिवाय न्यायमूर्ती लळीत यांना हर्षद आणि श्रेयश ही दोन मुले असून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, नंतर श्रेयश लळीतने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांची पत्नी रवीनाही वकील आहे.
न्यायव्यवस्थेत स्वतःची वेगळी ओळख
सरन्याधीशपदाची जबाबदारी स्वीकारणारे उदय लळीत हे चौथे मराठी न्यायमूर्ती ठरले आहेत. यापूर्वी पी .बी. गजेंद्रगडकर, यशवंत चंद्रचूड आणि शरद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च स्थान भूषवले होते. न्या. उदय लळीत हे वकिली करत असताना क्राईम लॉमध्ये विशेष प्राविण्यासाठी ओळखले जात असत. गुन्हेगारीशी संबंधित अनेक खटल्यात त्यांनी आपल्या अशिलांची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. कायद्याची जाण, मृदू स्वभाव, बिनतोड युक्तिवाद अशी त्यांनी आपली ओळख बनवली आहे. न्या. लळीत यांनी 1983 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीस सुरूवात केली होती. 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. त्यानंतर 1986 मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले.
पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार
सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात न्यायमूर्ती लळीत यांनी प्रत्येक प्रकरणांच्या यादीत पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच तातडीची प्रकरणे संबंधित खंडपीठांसमोर मुक्तपणे मांडता येतील यासाठी प्रयत्न करणार असून वर्षभर चालेल, असे एक घटनापीठ बनवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
कमी कालावधी मिळणार
लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून जवळपास 75 दिवसांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, आजपर्यंत न्या. कमल नारायण सिंह यांना सरन्यायाधीश म्हणून फक्त 18 दिवसांचा कालावधी मिळाला होता. न्या. सिंह हे 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 1991 पर्यंत सरन्यायाधीश होते. सर्वात कमी कालावधी मिळालेले हे सरन्यायाधीश आहेत. तसेच न्या. एस. राजेंद्र बाबू यांना फक्त 30 दिवसांचा कालावधी मिळाला. ते 2 ते 31 मे 2004 दरम्यान सरन्यायाधीश होते. न्या. जे. सी. शाह हे 17 डिसेंबर 1970 ते 21 जानेवारी 1971 या कालावधीत 36 दिवसांसाठी सरन्यायाधीश होते. न्या. गोपाल बल्लभ पटनायक यांनी 8 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2002 दरम्यान या 40 दिवसांसाठी सरन्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले आहे.