ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा 16 वा दिवस आहे. उपोषण मागे घेण्यासाठी जरांगे यांनी सरकारसमोर काही अटी ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावं अशीही त्यांची अट होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषय उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सायंकाळी पाच वाजता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्यावर तोडगा निघालेला नाही. सरकारने जरांगे पाटील यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यासाठी मंत्री उदय सामंत, संदिपान भुमरे, आमदार राजेश टोपे, अर्जुन खोतकर, नारायण कुचे यांनी यापूर्वी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. या ठिकाणी चर्चेदरम्यान मार्ग निघेल असं वाटत होतं, पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यावं, त्यांच्याशी चर्चा करुन मगच उपोषणाबाबत निर्णय घेऊ, असं जरांगे यांनी सांगितलं होतं.
त्यानुसार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे सायंकाळी पाच वाजता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. या बडय़ा नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतात का? हे पाहावं लागेल.