आम आमदारांची घोषणाबाजी ः सिसोदियांकडून पंतप्रधान मोदी लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कथित ऑपरेशन कमळवरून दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय नाटय़ादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने शुक्रवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करविले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच आम आदमी पक्षाच्या आमदारांनी ‘20 खोके’च्या घोषणा दिल्या आहेत. आमदारांना 20 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाचे काही आमदार नेतृत्वाच्या संपर्कात नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
तर विधानसभेत भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून घोषणाबाजी केली. सभागृहाच्या उपाध्यक्षांनी भाजपच्या सर्व आमदारांना दिवसभरासाठी मार्शल आउट करविले आहे. यानंतर भाजप आमदारांनी सभागृहाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळय़ानजीक निदर्शने केली आहेत.
कुणीही चांगले काम केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण होऊ लागते. आयुष्यात पहिल्यांदाच असुरक्षितपणाची भावना असणारा व्यक्ती पाहिला आहे. चांगले काम करणाऱयांना रोखणारे कृत्य पंतप्रधानांची मानसिकता दर्शवित असल्याची टीका उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.
भाजप आमदारांनीही अबकारी धोरणातील सिसोदिया यांच्या भूमिकेवरून घोषणाबाजी केली आहे. रस्त्यांवर मद्याच्या बाटल्यांचे कटआउट घेत शेकडो भाजप कार्यकर्ते निदर्शने करत होते. विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याच्या मुद्दय़ावर विरोधीपक्षनेते रामवीर सिंह विधूडी यांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे. विधानसभेला राजकीय आखाडय़ाचे स्वरुप दिले जाऊ नये. दिल्ली सरकारकडून बोलाविण्यात आलेले विधानसभेचे एकदिवसीय विशेष अधिवेशन लोकशाहीची थट्टा करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विधूडी यांनी केला आहे.