महासचिव के.सी. वेणुगोपाल यांची कबुली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्याने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीवरून काँग्रेस पक्षाची स्थिती व्यक्त केली आहे. 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारचा एकटय़ाने सामना करणे काँग्रेससाठी अत्यंत अवघड आहे. काँग्रेस स्वबळावर लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करू शकत नसल्याचे म्हणत काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षांना एकजूट होण्याचे आवाहन अप्रत्यक्षपणे केले आहे.
भाजपविरोधी मते विखुरली जाण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूटता सर्वात महत्त्वाची आहे. काँग्रेस देखील विरोधी पक्षांच्या एकतेवरून चिंतेत आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेकदा काँग्रेस एकटय़ाने मोदी सरकारचा सामना करू शकत नसल्याची स्थिती व्यक्त केली आहे. काँग्रेस कुठल्याही स्थिती लढणार आहे, परंतु आम्हाला या लोकशाहीविरोधी अन् हुकुमशाहीच्या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षाच्या एकजुटीची आवश्यकता भासणार असल्याचे वेणुगोपाल म्हणाले. देशात सध्या कुठल्या प्रकारची स्थिती आहे, हे सर्वजण जाणून आहेत. वर्तमान सरकार पूर्णपणे हुकुमशाहीच्या मार्गावर आहे. देशात अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. या हुकुमशाहीच्या विरोधात लढणे हे विरोधी पक्षांसाठी एक मोठे काम आहे, विशेषकरून काँग्रेस पक्षासाठी. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. आम्ही लवकरच मोदी सरकारच्या विरोधात व्यूहरचना करणार आहोत असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.