प्रतिनिधी/बांदा-
गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विलवडे – ग्रामपंचायत समोरील माणये होळ पूलावर पुराचे पाणी आल्याने बांदा – दाणोली मार्गावरील शुक्रवारी दुपारी वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी पावसाने काही प्रमाणात विश्रांतीनंतर ५ वाजता पाणी ओसरले. सायंकाळी उशीरा पाऊसाचा जोर सुरुच होता. पावसाचा जोर वाढत असल्याने विलवडे येथील मळावाडी पिसुर्णे या दोन वाड्यातील ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या आहेत.
गेल्यावर्षीच्या पुरात मळावाडीतील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले होते. पुराच्या वाढत्या पातळीमुळे विलवडे मळावाडीतील ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. घरातील वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुराची पातळी वाढत असल्याने वाफोली,इन्सुली,ओटवणे,सरमळेतील नदीशेजारील वाड्याही अलर्ट झाल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, सरमळे नदीवरील पूलावरही पुराचे पाणी आले आहे. झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही ठिकठिकाणी घडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. विलवडे धरणाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी सांगितले.
बांदा-सावंतवाडी मार्गावरील इन्सुली येथील दारू फॅक्टरीजवळ असलेल्या रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.बांदा पाटकर बागेजवळ रस्त्यावर पाणी आल्याने बांदा -वाफोली रस्ता बंद होता.फोटो : विलवडे येथे रस्त्यावर पाणी आल्याने दुपारच्या सुमारास बांदा -दाणोली मार्ग बंद होता. इन्सुली येथील सावंतटेम्ब येथे महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद होती