दोन्ही राष्ट्रगीतांचा आदर करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ ही दोन्ही राष्ट्रगीते एकाच पातळीवर असून देशातील प्रत्येक नागरिकाने दोघांचा समान आदर केला पाहिजे, असे मतप्रदर्शन केंद्र सरकारने शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात केले. राष्ट्रगान आणि राष्ट्रगीताबाबतच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, कायदा व न्याय मंत्रालय आणि इतरांकडून जनहित याचिकांवर उत्तर मागितले होते.
‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान यांच्यात समानतेची वागणूक मिळावी तसेच ‘वंदे मातरम्’ला समान आदर आणि दर्जा देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. याशिवाय 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले आहे. त्यावरील सुनावणीवेळी केंद्र सरकारला नोटीस पाठवून मत मागवण्यात आल्यानंतर केंद्राने आपली बाजू शनिवारी न्यायालयासमोर मांडली. यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने या जनहित याचिकेवर गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय आणि इतरांकडून उत्तर मागितले होते.
भारत हा राज्यांचा संघ आहे. येथे एकच राष्ट्रीयत्व असल्यामुळे दोन्ही राष्ट्रगीतांचा आदर करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी जन गण मन आणि वंदे मातरमला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या दोन्ही गोष्टी राज्यघटनेच्या रचनाकारांनी ठरविल्याने इतर कोणत्याही भावनांना प्रोत्साहन किंवा थारा देण्याची गरज नसल्याचे मत याचिकाकर्ते तथा भाजप नेते ऍड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केले आहे.
दोन्ही समान आदरास पात्र!
प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘जन-गण-मन’ आणि ‘वंदे मातरम्’ गायले जाते की नाही याची खात्री करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. ‘जन गण मन’मध्ये व्यक्त झालेल्या भावना देशाला डोळय़ासमोर ठेवून व्यक्त केल्या जातात. तथापि, वंदे मातरम्मध्ये व्यक्त झालेल्या भावना राष्ट्राचे चरित्र आणि शैली प्रतिबिंबित करतात. त्यामुळे वंदे मातरम् हे राष्ट्रगानही समान आदरास पात्र असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
रवींद्रनाथ टागोरांनी 1896 मध्ये कोलकाता येथे काँग्रेसच्या अधिवेशनात ‘वंदे मातरम्’ गायिले. त्यानंतर दक्षिण चरण सेन यांनी पाच वर्षांनंतर 1901 मध्ये कोलकाता येथे झालेल्या दुसऱया काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम् गायिले. सरला देवी चौदुरानी यांनी 1905 मध्ये बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम् गायिले, असे विविध दाखलेही याचिकेत देण्यात आले आहेत.
जन गण मन आणि वंदे मातरम्चा इतिहास
जन गण मन हे सर्वप्रथम डिसेंबर 1911 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायिले गेले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. त्याचवेळी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये बंगाली भाषेत वंदे मातरम् लिहिले. 1881 मधील आनंदमठ या कादंबरीतही त्यांनी याला स्थान दिले. त्यानंतर या गाण्याची लोकप्रियता वाढली. 1896 मध्ये कोलकाता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी ‘वंदे मातरम’ गायिले होते. तसेच लाला लजपतराय यांनी लाहोरमधून वंदे मातरम नावाचे मासिक सुरू केले होते.