वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच राजस्थान आणि छत्तीसगडमधींल खासदारांनाही मंत्रिपदे दिली जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना सरकार आणि पक्षसंघटनेत स्थान देण्यात येईल.
यासंदर्भात सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संघटना महासचिव बी. एल. संतोष यांची बैठक झाली होती. नंतर मंगळवारीही बैठक घेण्यात आली. काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष नव्याने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यांसाठीं नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात येतील. नव्या चेहऱ्यांना राज्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात येणार आहे.
संघटनेत नव्यांना आणणार
पक्षाध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांच्या सहकाऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. तीन महासचिव वाढविले जाऊ शकतात. गुजरातमधील एक-दोघांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचा पक्षाचा विचार आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्यात नवे चेहरे घेण्यात येईल अशी शक्यता पक्षसूत्रांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
छत्तीसगड सरकारविरोधात आंदोलन
छत्तीसगडमध्ये असलेल्या काँग्रेस सरकारविरोधात भाजपने आंदोलन सुरु केले असून त्याची तीव्रता वाढविण्याची योजना सज्ज करण्यात आली आहे. तेथील भाजप संघटनेत नवचैतन्य भरण्यासाठी दोन-तीन नव्या आणि तरुण नेत्यांना प्रकाशात आणण्याची तयारी करण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
नवे मित्रपक्ष जोडणार
बिहारसह सहा राज्यांमध्ये भाजप नवे मित्रपक्ष जोडणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यपक्षांची संख्या वाढविण्यात येणार आहे. काही जुने मित्रपक्षही पुन्हा या आघाडीत येऊ शकतील अशी स्थिती आहे. पंजाबमध्ये अकाली दल पक्षाने तशी इच्छा अप्रत्यक्षरित्या प्रगट केली आहे. तसेच आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपबरोबर जाण्याचे संकेत दिले आहेत. या जुन्या मित्रपक्षांशी आगामी काळात चर्चा करण्याचा भाजप नेतृत्वाचा विचार आहे. तसेच, बिहारमध्ये काही स्थानिक पक्षांशी युती होऊ शकते. तामिळनाडू आणि केरळमध्येही काही स्थानिक पक्षांना हाताशी घेण्याचा विचार आहे. बिहारमध्ये मुकेश सहानी यांचा व्हीआयपी पक्ष, चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती (रामविलास पासवान), आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक जनता दल यांच्याशी हातमिळवणी शक्य आहे. नुकतीच या तीन नेत्यांना झेड सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.