आंबा झाडाना मोहोर नसल्याने व्यावसायिकांना नुकसान होण्याची दाट शक्यता : मध्यंतरी पडलेल्या धुक्याचा परिणाम
वार्ताहर / उचगाव
चालू वर्षाच्या हंगामामध्ये आंबा बागांमधून झाडाला अद्याप मोहोर आलेला दिसत नाही. सर्व झाडे पालवल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, मोहोराचा पत्ता नाही. काजू झाडांना मात्र मोहोर भरभरून आल्याने चालूवर्षीच्या हंगामात काजू मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आंबा बागायतमधून फसगत होण्याची चिन्हे शेतकरी व बागायत दारातून दिसत आहेत.
शेतकरी व बागायतदारांचे बरेचसे अर्थकारण काजू व आंबा पिकांवर अवलंबून असते. चालूवर्षीच्या हंगामामध्ये, काजू झाडांना अधिक प्रमाणात मोहोर आल्याचे दिसून येत आहे. मात्र आंबा बागेमधून मोहोराच्या प्रमाणात बरीच घट दिसून येत आहे. तालुक्यात काजूवर आधारित अनेक उद्योग कार्यरत असून, त्यापासून अनेक महिलांना रोजगार मिळत आहे. फळधारणेच्या काळातच दाट धुके पडल्याने काही झाडांना आलेला आंबा मोहोर जळाला. काही झाडे पालवल्याने मोहोरच अद्याप आलेला नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता शेतकरी आणि बागायतदारांमधून वर्तविण्यात येत आहे.
पश्चिम भागामध्ये खडकमिश्रित लाल माती आणि पोषक हवामानामुळे काजूचे पीक दरवर्षी चांगले मिळते. संकरित जातीच्या झाडांना मोहोर लवकर येतो. सर्वसामान्यपणे फेब्रुवारीमध्ये फळधारणा सुरू होते. फेब्रुवारीअखेरपासून काजू परिपक्व होतात व मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून काजू हंगामाला सुरुवात होते. मार्च ते एप्रिल या काळात काजूला बहर असतो. उशिरा लागलेल्या काजूचा हंगाम मे अखेरपर्यंत राहतो. मात्र यावर्षीचे चित्र थोडे बदललेले दिसून येत आहे. मध्यंतरी पडलेले दाट धुके व थंडी याचा थेट परिणाम आंबा पिकांवर होत असल्याचे मत शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगुंदी, राकसकोप, यळेबैल, सोनोली, हंगरगा, मंडोळी, किणये, कर्ले, कुद्रेमनी, बाची, कल्लेहोळ, उचगाव, अतिवाड, बेकिनकेरे, गोजगे, मण्णूर, बसुर्ते, तुरमुरी, सुळगा या संपूर्ण भागांमध्ये प्रतिवर्षी काजू, आंबा हे फळउत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या परिसरात जवळजवळ अनेक शेतकरी काजू, आंबा बागायतदार या पिकांवर अवलंबून आहेत. वैशिष्ट्या म्हणजे या पिकाला विशेष खर्च नसल्याने पडिक जमिनीतसुद्धा उत्पादन काढता येते. या बागेत भात, नाचणा, रताळी, भुईमूग आदी आंतरपिकेसुद्धा घेतली जातात. मुरट्यांपासून मद्यार्क तयार होते. या भागातून हे मुरटे गोव्याला पाठविले जातात. काजूबरोबर आता मुरट्यांनादेखील भाव मिळत असल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. काजूच्या झाडापासून मिळणाऱ्या डिंकालाही चांगली मागणी असते. काजूवर प्रक्रिया करणारे अनेक व्यवसाय या भागात सुरू असल्याचेही चित्र दिसून येते. काजू पिकांना सर्वात मोठा धोका धुक्याचा असतो. असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
धुके तीन प्रकारचे
भुकटी, चिकटे व पाण्याचे धुके असे तीन प्रकार आहेत. भुकटी धुक्यात ओलसरपणा नसतो. मोहोरावर हे धुके पडताच मोहोर काळपट होऊन मोहोर जळून जातो. या पट्ट्यात भुकटी व चिकटे धुके पडते.
चिकटे धुके
या धुक्यात एकप्रकारचा ओलसर चिकट पदार्थ असतो. हा पाणीदार चिकट प्रकार मोहोरावर पडताच मोहोराला चिकटून बसतो व मोहोराला जाळून टाकतो. किरकोळ प्रमाणात फळधारणा झाली असली तरी फळे पिवळी होऊन पडणे, गळून पडणे असे चित्र दिसू लागते.
पाण्याचे धुके
या प्रकारात पाण्याचा अंश अधिक असतो या धुक्याचा परिणाम मोहरावर होत नाही. फळधारणा होतच राहते झाडावर पडलेले धुके पाण्याच्या स्वरूपात खाली ठपकायला लागते झाडाखाली पाऊस पडल्याचे चित्र निर्माण होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज
या भागातील पिकांवर येणारी नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी तसेच नैसर्गिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कृषी खात्याने बागायतदार शेतक्रयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
बागा पालवल्याचा परिणाम
दरवर्षीचे चित्र पाहता यावर्षी नागरिकांना आंबा खायला मिळतो की नाही अशी शंका वाटू लागली आहे. आंब्याच्या बाग पालवल्याने पिकांवर परिणाम झाला असून, आंबा पिकांवर मोठी घट जाणवण्याची शक्यता आहे.
राजू ताशिलदार(आंबा, काजू व्यापारी)
दरवर्षी आंब्याचे पीक भरगोस पण
गेल्या अनेक वर्षापासून आंबा, काजू बागा घेऊन आम्ही व्यापार करतो. दरवर्षी आंब्याचे पीक भरगोस येते. यामुळे आंबा प्रदेशात तसेच स्थानिक पातळीवर आम्ही पुरवठा करतो. मात्र यावर्षीचे चित्र पूर्णत? वेगळेच दिसून येत आहे.
समद ताशिलदार