Chandrayaan 3 Landing Successful : देशासह जगाचे लक्ष लागून राहिलेले इस्त्रोच्या चांद्रयान 3 चे यशस्वी लॅन्डींग झाले. आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या चांद्रयान उतरलं. 140 कोटी भारतीयांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. हा क्षण भारतासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. हा क्षण भारताच्या उद्यमान भाग्याचे आवाहन असल्याची प्रतिक्रिया चांद्रयान 3 चे सॉफ्ट लॅन्डींग होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हा ऐतिहासिक क्षण साऱ्या देशवासियांनी आज अनुभवला. चांद्रयान चंद्रावर उतरून भारताने इतिहास घडवला अस म्हणत इस्त्रो शास्त्रज्ञांसह देशवासीयांना मोदींनी शुभेच्छा दिल्या.
भारत चंद्रावर पोहचला अशी प्रतिक्रिया शास्त्रज्ञांनी दिली. हा क्षण पाहण्यासाठी इस्त्रोची टीम अनेक वर्षापासून काम करत होती. संपूर्ण टीम आनंद व्यक्त करत आहे. देशभरामध्ये सेलिब्रेशन करण्यात आले. रस्त्यावर उतरून लोकांनी आनंद व्यक्त केला.14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.
शरद पवार यांनी दिल्या शुभेच्छा
चांद्रयान 3 हा भारताचा अंतराळातील सर्वात महत्वाचा प्रयत्न !!! चांद्रयान 3 च्या यशाने वैज्ञानिक समुदायाला आत्मविश्वास दिला आहे आणि आपल्या देशासह संपूर्ण जगाला अभिमान वाटेल! सर्व शास्त्रज्ञ आणि सहकारी भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. इस्रोचे असेच अभिनव प्रयोग अवकाशात झेपावत राहोत..!
काँग्रेसने ट्विट करत दिल्या शुभेच्छा
भारताचा चंद्र आणि त्यापलीकडील प्रवास ही अभिमानाची, दृढनिश्चयाची आणि दूरदृष्टीची यश आहे. हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि दूरदृष्टीने भारतीय अवकाश संशोधनाचा पाया घातला. आज चांद्रयान- 3 चे यश त्यांच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचे परिणाम असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने ट्विट करत दिली आहे.
अंतराळ क्षेत्रात देखील भारत अग्रेसर-आदिती तटकरे
संपूर्ण जगाने दखल घेतलेली चांद्रयान-३ मोहीम इस्रोच्या वैज्ञानिकांनी यशस्वी करून दाखवली आहे. चांद्रयान-३ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळ क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केलंय, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली.