किवीजचा आत्मविश्वास दुणावलेला असला तरी मायदेशात भारताचे पारडे जड
वृत्तसंस्था/ हैदराबाद
लंकेविरुद्धची मालिका एकतर्फी जिंकल्यानंतर भारतीय संघाची आता न्यूझीलंडविरुद्ध मालिका होत असून या मालिकेतील पहिला वनडे सामना आज बुधवारी येथे होत आहे. वनडेमध्ये विश्वविक्रमी वेगवान द्विशतक नोंदवणाऱया इशान किशनला लंकेविरुद्धच्या मालिकेत संघाबाहेर ठेवल्याबद्दल बरीच टीका झाली होती. पण या सामन्यात त्याला अंतिम संघात स्थान मिळण्याची अपेक्षा असून त्याला मधल्या फळीत खेळविले जाण्याची शक्यता आहे. दुपारी 1.30 वाजता सामन्याला प्रारंभ होत असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत इशानने वनडे इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक नोंदवण्याचा विक्रम केला होता. तरीही त्याला लंकेविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली नव्हती. सातत्यपूर्व कामगिरी करणाऱया शुबमन गिलला त्याच्या जागी सलामीला निवडण्यात आले. त्यानेही संधीचा लाभ घेत 70, 21, 116 अशा धावा जमवित आपली निवड सार्थ ठरविली. न्यूझीलंडविरुद्ध आजच्या सामन्यातही सलामीच्या जोडीत कोणताही बदल होणार नाही. मात्र केएल राहुल वैयक्तिक कारणासाठी या सामन्यात खेळणार नसल्याने इशानला त्याच्या जागी संघात स्थान मिळू शकते. तसे झाल्यास त्यालाच यष्टिरक्षणही करावे लागेल. त्याने आजवर 10 वनडे खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात तो मध्यफळीत खेळलेला आहे. त्यामुळे ऍडजस्ट करण्यात त्याला फारशी अडचण येणार नाही. दुसरा यष्टिरक्षक केएस भरतला पुन्हा एकदा राखीवमध्येच रहावे लागेल. त्याला केएल राहुलचा कव्हर म्हणूनच निवडण्यात आले आहे.
विश्वचषकाच्या वर्षात प्रत्येक सामना महत्त्वाचा असून लंकेविरुद्ध मिळालेल्या यशाचा लाभ उठवण्याचा भारत प्रयत्न करेल. लंकेने मात्र त्या मालिकेत प्रत्येक विभागात साफ निराशा केली होती. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना मिळालेला फॉर्म आणि नव्या चेंडूवर बळी मिळविण्याची सिराजची क्षमता लंकेविरुद्धच्या मालिकेत दिसून आली. गिल व कोहलीप्रमाणे रोहित शर्माही चांगल्या टचमध्ये दिसून आला. त्यामुळे बऱयाच काळापासून हुलकावणी देत असलेले शतक तो या मालिकेत नोंदवेल अशी अपेक्षा आहे. कोहली मात्र पूर्ण बहरात असल्याने प्रमुख गोलंदाजांच्या गैरहजेरीत त्याला रोखण्याचे न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान असेल.
मागील वर्षी श्रेयस अय्यरने वनडेमध्ये शानदार कामगिरी केली होती. पण मागील तीन डावात त्याला चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करता आली नाही. त्याने 28, 28, 38 अशा धावा जमविल्या. त्याला पाठदुखीची समस्या असून या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला आपले स्थान पक्के करण्यासाठी तीन सामने निश्चितच मिळू शकतील. सूर्या व हार्दिक पंडय़ा यांच्यामुळे मध्यफळी मजबूत झाली असून अखेरच्या टप्प्यात ते वेगवान धावाही करू शकतात.
राहुलप्रमाणे अक्षर पटेललाही या मालिकेत ब्रेक देण्यात आला असून त्याच्या जागी शाहबाज अहमदला संधी मिळेल. मात्र व्यवस्थापन त्याला संधी देते की न्यूझीलंडमध्ये डावखुरे फलंदाज असल्याने वॉशिंग्टन सुंदरला संधी देतात हे पहावे लागेल. भारताने आतापर्यंत फिंगर व मनगटी स्पिनर्सना अंतिम संघात खेळविले आहे. त्यामुळे चहल व कुलदीप यादव यापैकी एकाला निवडले जाईल. लंकेविरुद्ध कुलदीपने प्रभावी गोलंदाजी केल्याने त्याला पसंती दिली जाऊ शकते.
स्टार खेळाडू नसले तरी भक्कम संघ
न्यूझीलंड संघात स्टार खेळाडू केन विल्यम्सन, टिम साऊदी, मिल्ने नसले तरी त्यांना हरविण्यासाठी भारताला सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल. हंगामी कर्णधार टॉम लॅथमने मागील मालिकेवेळी जबरदस्त कामगिरी केली होती. याशिवाय पाकिस्तानविरुद्धची मालिका प्रथमच जिंकून ते येथे दाखल झाले असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. आक्रमक सलामीवीर फिन ऍलेन पाकमध्ये चमकला नसला तरी त्याची भरपाई तो या मालिकेत करण्यास उत्सुक असेल. याशिवाय ग्लेन फिलिप्सला रोखण्यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागतील. पाकविरुद्ध निर्णायक सामन्यात त्याने एकहाती न्यूझीलंडला विजयासह मालिका जिंकून दिली होती. ईश सोधीही या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे लॅथमने सांगितले.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), गिल, इशान किशन, कोहली, अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंडय़ा, सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, चहल, कुलदीप, शमी, सिराज, उमरान मलिक.
न्यूझीलंड ः टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलेन, डग बेसवेल, मायकेल बेसवेल, चॅपमन, कॉनवे, जेकब डफी, फर्ग्युसन, डॅरील मिशेल, निकोल्स, फिलिप्स, सँटनर, हेन्री शिपले, सोधी, ब्लेअर टकनर.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
मायदेशात भारताचे पारडे जड
भारत व न्यूझीलंड यांच्यात आजवर 113 वनडे सामने झाले असून भारताने 55, न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. एक टाय झाला तर 7 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. भारतामध्ये या दोघांत 35 सामने झाले असून 26 भारताने तर 8 सामने न्यूझीलंडने जिंकले. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
जखमी श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर, पाटीदारला संधी
मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्याला या मालिकेसाठी अनफिट ठरविण्यात आले, असे बीसीसीआयने सांगितले. तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होऊन त्यावर उपचार करून घेणार आहे. त्याच्या जागी मध्यप्रदेशच्या रजत पाटीदारला निवडण्यात आले असून त्याला याआधीही काही मालिकांत निवडण्यात आले होते.