वार्ताहर /दाभाळ
धो धो कोसळणाऱया पावसामुळे तीन दिवसांपूर्वी निरंकाल व दाभाळ गावामधून वाहणाऱया उण्णै नदीला पूर येऊन सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस पेण्यामळ, निरंकाल भागातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने निरंकाल व दाभाळ गावाचा संपर्क तुटला होता. शुक्रवारी सकाळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पेण्यामळ, निरंकाल भागातील रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कामगारवर्ग, विद्यार्थी व अन्य प्रवाशांचे हाल झाले. निरंकालहून काही अंतरावर असलेले दाभाळ गाव गाठण्यासाठी या मार्गावरील वाहनांना धारबांदोडा किंवा पाज, बिंबळ, वागोण मार्गे पर्यायी लांब पल्ल्याचा रस्ता धरावा लागला.
गेल्या वर्षीही जुलै महिन्यात या उण्णै नदीला असाच महापुर आल्या होता. त्यावेळी पेण्यामळ, तारीभाट, माट्टिधाड, जांभळीमळ, ही गावे पाण्याखाली गेल्याने अनेक घरांची मोठी नुकसानी झाली होती. मागील काही वर्षांमध्ये या नदीला सातत्याने पूर येत आहे. त्य़ामुळे दोन ते चार दिवस पुराचे पाणी ओसरेपर्यंत दाभाळ व निरंकाल भागांचा संपर्क तुटतो. नदीच्या काठवर वसलेल्या माट्टिधाड, तारीभाट, पेण्यामळ व जांभळीमळ गावातील बहुतेक लोकांना या पुराचा फटका बसतो. बुधवारी थोडीशी उसंत घेतल्याने पावसाने गुरुवारी रात्री पासून जोर धरल्याने शुक्रवारी सकाळी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला व रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. सकाळी कामावर गेलेले कामगार, विद्यार्थी सायंकाळी घरी परतताना अडकून पडले. काहींनी डोंगर माथ्यावरून जंगलातून वाट काढीत घर गाठले. पूरजन्य स्थितीमुळे आसपास राहणाऱया नागरिकांनी धसका घेतला आहे.