कराड प्रतिनिधी
पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं… हणबरवाडी शहापूर योजना चालू झालीच पाहिजे… शेतकरी एकजुटीचा विजय असो, निर्दयी सरकारचा धिक्कार असो.. अशा घोषणा देत आज मसूर येथील मुख्य चौकात हणबरवाडी शहापूर योजना चालू करण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील रस्त्यावर उतरले होते. सुमारे तासभर झालेल्या आंदोलनानंतर विद्यमान पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी 21 तारखेच्या टंचाई मीटिंगमध्ये विषय घेऊन 22 तारखेला या योजनेला पाणी सोडू असे आश्वासन दिल्यानंतर येथील रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अजितराव पाटील चिखलीकर, माजी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सौ संगीता साळुंखे माई, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, सह्याद्री कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, प्रशांत यादव, तानाजीराव साळुंखे, तानाजीराव जाधव, डॉक्टर विजय साळुंखे, अशोक संकपाळ, भाऊसाहेब चव्हाण, सुनील साळुंखे, अनिल चव्हाण, एडवोकेट रणजीत जगदाळे, आत्माराम घोलप, संजय घोलप, भीमराव इंगवले, भानुदास जाधव, रमेश जाधव, बाळासाहेब जगदाळे आधीसह परिसरातील विविध गावचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
हणबरवाडी शहापूर उपसा सिंचन योजनेसाठी २८ डिसेंबर २०२३ ला मोटर पंप चालु करुन पाईपलाईन चाचणी झाली, तेव्हापासून आज अखेर ही योजना चालू नाही, ही योजना चालू करणेसाठी आज राज्याचे माजी सहकार मंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री त्यांच्या उपस्थितीत मसूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या योजनेत मसुरसह राजमाची, मेरवेवाडी, करवडी, वाघेरी, वडोली(नि), शहापुर, रिसवड, अंतवडी, माळवाडी, यादववाडी, चिखली, किवळ, खोडजाईवाडी, घोलपवाडी, वनवासमाची, निगडी, हणबरवाडी, वाण्याचीवाडी येथील गावातील सुमारे 2600हेक्टर क्षेत्र ओरीताखाली येणार आहे .
सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून हक्काच्या पाण्यासाठी आज शेतकरी माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शांततेत या आंदोलनात सहभागी झाली होते. यावेळी उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, मसूरचे सपोनि विठ्ठल शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनादरम्यान एक तास पाटण पंढरपूर राज्य मार्गासह कराड मसूर व इतर चौकात येणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता घनवट व नांगरे यांनी लेखी वसंत दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले