गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष
प्रतिनिधी / पणजी
राज्यात दीड दिवसांच्या गणरायाला गुरुवारी मोठय़ा भक्तीभावाने निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व दारूकामाच्या आतषबाजीच्या संगतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
राज्यातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला बुधवारी प्रारंभ झाला. भटजींच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून घरोघरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. काल दुसऱया दिवशी प्रत्येकाने एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. दुपारी घुमट आरती करण्यात आली. सुमधूर भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते.
सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. अलिकडच्या काळात बहुतेकांच्या घरी किमान एकतरी चारचाकी वाहन असल्यामुळे विसर्जनासाठी मूर्ती डोक्यावर घेऊन जाण्याची परंपरा कालबाह्य होऊ लागली आहे. तरीही अनेक ग्रामीण भागात भाविकांनी मूर्ती डोक्यावरून घेऊन विसर्जनस्थळी नेण्यात आल्या. त्यावेळी घुमट आरतींच्या बैठका, महिलांतर्फे फुगडय़ा, दारुकामाची आतषबाजी असे चित्र दिसून आले. शहरी तसेच ग्रामीण भागात पोलिसांची उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायती, नगरपालिका प्रतिनिधी यांच्यातर्फे विसर्जन ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पाच ते अकरा दिवस तर काही ठिकाणी 21 दिवसपर्यंतही गणशोत्सव साजरा करण्यात येतो.