गॅरंटी आदेश लागू करा : महिला प्रवाशांची मागणी
बेळगाव : काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर महिलांना मोफत बस प्रवास देणार असल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्याने महिलांना मोफत प्रवासासाठी गॅरंटी योजनेची घोषणा करावी, अशी मागणी महिला प्रवाशांतून होऊ लागली आहे. काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. आता सत्ताधारी काँग्रेससमोर गॅरंटी योजनांची पूर्तता करण्याचे आव्हान आहे. निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने महिलांसाठी मोफत बसप्रवासासह पाच गॅरंटी योजनांचे आश्वासन दिले होते. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत योजना जारी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यासंबंधीची विस्तृत मार्गसूची जारी करणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. मात्र, मोफत बसप्रवासासाठी परिवहन मंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला तिकीटाचे पैसे देण्यास नकार दर्शवत आहेत. दरम्यान तिकीटाच्या मुद्द्यावरून बस वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी सरकारने मोफत बस प्रवासाच्या गॅरंटी योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही सर्वसामान्यातून होऊ लागली आहे. महिलांकरिता मोफत प्रवासाची योजना जारी करताना सरकारने आगाऊ निधी मंजूर करावा लागणार आहे. ही योजना अंमलात आणण्यासाठी परिवहनला अनुदान देणे देखील आवश्यक आहे.