सायंकाळपर्यंत 6684 तक्रारी अन् निवेदने स्वीकृत : 21 तक्रारींवर जनता दर्शन कार्यक्रमस्थळीच तोडगा
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेवरून प्रथमच राज्यभरात एकाचवेळी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनता दर्शन’ कार्यक्रम पार पडला आहे. याला नागरिक आणि अधिकाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दोन जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सायंकाळी 6:30 पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार 6684 तक्रारी आणि निवेदने स्वीकारण्यात आली. त्यापैकी 21 तक्रारींवर जनता दर्शन कार्यक्रमस्थळीच तोडगा काढण्यात आला. तर उर्वरित 6663 अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहेत.
राज्यातील जनतेला त्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी बेंगळूरपर्यंत धावाधाव करणे आणि तेथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ताटकळणे टाळता यावे यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवरच समस्यांचे निवारण करण्याची व्यवस्था करण्यात आली. सोमवारी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जनता दर्शन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा पालकमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ, जिल्हा प्रभारी सचिव आदी अधिकारी उपस्थित होते.
आता प्रत्येक जिल्ह्यात 15 दिवसांतून एकदा जनता दर्शन कार्यक्रम होणार आहे. सोमवारी राज्यभरात झालेल्या जनता दर्शनमध्ये स्वीकारण्यात आलेल्या तक्रारींमध्ये महसूल खात्याचा सर्वाधिक वाटा होता. या खात्याशी संबंधित (सायंकाळी 6:30 पर्यंत) 2100 तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर ग्रामविकास-पंचायतराज खात्याशी संबंधित अधिक तक्रारी व निवेदने जमा झाली. त्यानंतर नगरविकास खात्याशी संबंधित सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. जिल्हा पंचायत सीईओंसमोर अधिक गाऱ्हाणे मांडण्यात आले.
हावेरी जिल्ह्यात सर्वाधिक 774 तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर 432 तक्रारींसह हासन जिल्हा दुसऱ्या स्थानी तर कोलार जिल्ह्यात 423 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. अर्ज स्वरुपात आलेल्या तक्रारींवर तेथेच तोडगा काढण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. तसेच तोंडी तक्रारी नोंदवून घेण्याबरोबरच त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू होते.
हावेरी जिल्ह्यात पीकविम्यासंबंधी हजारो अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, तांत्रिक समस्येमुळे ‘आयपीजीआरएस’मध्ये अपलोड करणे शक्य झाले नाही. म्हैसूर जिल्ह्यातही हीच समस्या निर्माण झाली. त्यामुळे तेथील अर्ज अपलोड करण्याचे काम विलंबाने सुरू करण्यात आले.
राज्यात एकाच वेळी झालेला जनता दर्शन कार्यक्रम हा पहिलाच अनुभव आहे. जनतेकडून अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. अधिकाऱ्यांकडून तक्रारी निकाली काढण्यासाठी झालेले प्रयत्नही समाधानकारक आहेत. पुढील वेळी कार्यक्रमाचा दर्जा आणखी वाढविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांमधून व्यक्त झाली आहे.
बेळगाव, गदग जिल्ह्यात आज जनतादर्शन कार्यक्रम
काही अनिवार्य कारणांमुळे सोमवारी बेळगाव आणि गदग जिल्ह्यांमध्ये जनता दर्शन कार्यक्रम झाला नाही. बेळगावमध्ये मंगळवार दि. 26 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.