मजुरांचा तुटवडा, शेतात चिखल करण्यासाठी पॉवर टिलर, टॅक्टरची मागणी वाढली : संततधारमुळे रोप लागवडीला अनुकूल वातावरण
वार्ताहर /चापगाव
खानापूर तालुक्यात यावर्षी जून महिन्यात चांगला हंगाम दिल्याने भात पेरणीची कामे पूर्णत्वाला आली. आता गेल्या चार दिवसात दमदार पावसाने सुरुवात केल्याने भात रोप लागवडीसाठी चांगला हंगाम मिळाला आहे. तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मान्सूनच्या तरण्या नक्षत्राने पावसाळय़ाला दमदार सुरुवात केली आहे. सुरू असलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसात शेतवडीत पाणी झाल्याने भात हंबडणीच्या कामाला वेग आला आहे. शिवाय शेतकरीवर्ग रोप लागवडीच्या कामात गुंतला आहे.
तालुक्यात दरवर्षी जवळपास 20 टक्के शिवारात रोप लागवड केली जाते. जांबोटी-कणकुंबी भागात भात रोप लागवडीची कामे सध्या जोरात आहेत. तालुक्याच्या पूर्व व मध्य भागात उन्हाळी मिरची पिके मोठय़ा प्रमाणात घेतली जातात. चापगाव, वड्डेबैल, कोडचवाड, लोकेळी भागात तसेच पूर्व भागातील पारिश्वाड, हिरेमुन्नवळी भागात उन्हाळी मिरची पिके मोठय़ा प्रमाणात घेतात. त्यामुळे या भागात भातरोप लागवड केली जाते. मागील आठवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे भात रोप लागवडीला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान पसरले आहे.
रोप लागवडीसाठीदेखील हंगाम अनुकूल असल्याने तालुक्यात सध्या भाताची रोपे लावण्यात शेतकरीवर्ग गुंतला आहे. एकाच वेळी सर्व ठिकाणी भातरोप लागवड सुरू असल्याने मजुरांची कमतरताही मोठय़ा प्रमाणात भासत आहे. यामुळे शेजारील जोयडा तालुक्यातील शेतमजुरांना आणून भाताची रोपे लावण्यामध्ये गुंतला आहे. भातरोप लागवडीसाठी जमिनीत चिखल करावा लागतो. यासाठी पूर्वी बैल व रेडा जोडीने चिखल करण्यात येत होता. गेल्या काही वर्षांपासून पॉवर टिलर व ट्रक्टरच्या सहाय्याने चिखल करण्यात येत आहे. त्यामुळे बैलजोडीचे काम सुकर झाले आहे. भातरोप लागवडीचा हंगाम एकदम आल्याने सगळीकडे मजुरांची टंचाई भासत आहे. शेजारच्या तालुक्यातून मजूर आणून भातरोप लागवड हंगाम साधण्यात शेतकरी गुंतला
आहे.
जांबोटी-कणकुंबी भागात भातरोप लागवडीच्या कामाला वेग
जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. शेतवडीत सर्वत्र मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागात भातरोप लागवडीच्या कामांना वेग आला आहे. भातरोप लागवडीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू आहे.
खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील शेतकरीवर्ग भात पेरणीऐवजी भातरोप लागवड मोठय़ा प्रमाणात करतात. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात भातरोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरुची पेरणी करण्यात येते. भातरोपांची उगवण झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांच्या कालावधीनंतर भातरोपांची शेतवडीत लागवड करण्यात येते, यासाठी संततधार पाऊस तसेच शेतवडीत मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाण्याची आवश्यकता असते. पूर्वी बैलजोडी व औताच्या सहाय्याने शेतवडीमध्ये पारंपरिक पद्धतीने पाण्यातील मशागतीची कामे करून, रोप लागवड करण्यात येत होती. मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षापासून शेतकरी पॉवर ट्रिलरसारख्या आधुनिक यांत्रिक औजारांचा वापर करून भातरोप लागवडीसाठी आवश्यक मशागतीची कामे करण्यात येत असल्यामुळे आता भातरोप लागवडीची कामे सोपी झाली आहेत. मात्र यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासते. रोप लागवडीसाठी महिला मजुरांना मोठी मागणी असल्यामुळे मजुरीचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. उत्पादन खर्चातदेखील वाढ झाली आहे. सध्या या भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रोप लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
भातरोप लागवडीची कामे नागपंचमीपर्यंत पूर्ण होण्याची शक्मयता आहे. या भागातील शेतजमीन भातरोप लागवडीसाठी अनुकूल असून रोप लागवडीनंतर भांगलणीची कामे कमी प्रमाणात लागतात. तसेच शेतकरी वर्गाला रोप लागवडीमधून जादा उत्पन्न मिळत असल्यामुळे या भागातील शेतकरी भातरोप लागवडीवरच अधिक भर देतात.