केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन, चोळ, पांडय़ा आणि मौर्यांकडे दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताला सात-आठ हजार वर्षांचा वैभवी इतिहास आहे. तथापि, भारताच्या इतिहासकारांनी मोंगल कालखंडाला जितके महत्त्व दिले, तितके त्याआधीच्या संपन्न राजवटींना दिले नाही. त्यामुळे फार मोठा असमतोल निर्माण झाला आहे. भारताचा इतिहास मोंगलापासूनच सुरू होतो, अशी समजूत या पक्षपाती मांडणीमुळे झाली आहे, अशा अर्थाचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
भारतात मुस्लिमांची राजवट येण्यापूर्वी उत्तरेत मौर्य व इतर राजघराणी तसेच दक्षिणेत चोळ, चालुक्मय, शिलाहार इत्यादी राजघराणी होती. त्यांनी भारताला वैभवाच्या शिखरावर नेले होते. त्यांचा इतिहास फारसा चर्चेत नसतो. त्यावर प्रकाश टाकण्याचे काम इतिहासकारांकडून झाले पाहिजे. तथापि, इतिहासकारांनी त्यांना म्हणावा तसा न्याय दिलेला नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
इतिहास लेखनात सुधारणा करूच
भारताचा इतिहास नव्याने मांडण्याची आवश्यकता आहे. मुस्लीम राजवटीच्या पूर्वीच्या इतिहासावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे भारत सरकारने इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आम्ही आमचा हा प्रकल्प पार पाडणारच आहोत. कोणीही आम्हाला कोणत्याही कारणास्तव विरोध करू शकत नाही. सरकारची भूमिका यासंबंधी स्पष्ट आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
इतिहासकारांनी पुढाकार घ्यावा
वर्तमानकाळात इतिहासावरून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपला वैभवी इतिहास सांप्रतच्या काळातही आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. इतिहासाची मांडणी करताना वर्तमानकाळाचे भान ठेवणे आवश्यक आहे. अकराव्या शतकापासून एक हजार वर्षे भारतीय योद्धय़ांनी आपली संस्कृती, धर्म आणि भाषा यांच्या संरक्षणासाठी परकीय मुस्लीम आक्रमकांबरोबर निकराचा लढा दिला. त्यामुळेच आज या सर्व बाबी पूर्वीप्रमाणेच असल्याचे आपल्याला दिसून येते. मुस्लीम आक्रमणापूर्वी पांडय़ा राजवटीने आठशे वर्षे राज्य केले. त्याचप्रमाणे आसाममधील अहोम साम्राज्य 650 वर्षे होते. अहोम राजांनीच नालंदा विश्वविद्यालयाचा नाश करणाऱया बख्तियार खिलजीचा पराभव केला होता. औरंगजेबापासूनही त्यांनी आपले साम्राज्य सुरक्षित ठेवले होते. मोंगलांना आसाम कधीही पूर्णतः जिंकता आला नाही. दक्षिणेमध्ये पल्लव साम्राज्य 600 वर्षे होते. तर चोळ साम्राज्यही तितकाच काळ राज्य करून गेले आहे. मौर्याच्या काळात भारताच्या सीमा अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत होत्या. 550 वर्षे या प्रचंड भूभागावर उत्तरेतील सम्राटांचे राज्य होते. मध्य आणि दक्षिण भारतात सातवाहनांची सत्ता 500 वर्षे होती. तर गुप्त साम्राज्य 400 वर्षे होते. समुद्र गुप्त या सम्राटाने एकात्म भारताची संकल्पना प्रथम विशद केली होती. हा सर्व इतिहास वर्तमानकाळासाठी अभिमानास्पद असून त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणे आवश्यक आहे. या इतिहासाचे पुरावेही उपलब्ध असून आम्ही त्याचेच पुनर्लेखन करणार आहोत, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.
व्यापक कार्य
इतिहासाच्या पुनर्लेखनाचे हे कार्य व्यापक स्वरुपाचे असून त्यासाठी अनेक तज्ञांचे साहाय्य घ्यावे लागणार आहे. आतापर्यंत इतिहासामध्ये हेतूपुरस्सर घुसवण्यात आलेली असत्ये दूर करणे आवश्यक असून आम्ही ते कार्य हाती घेतले आहे. इतिहास केवळ विजय किंवा पराभव यांच्या पायावर लिहिला जात नसतो. तर कोणत्याही घटनेचा परिणाम महत्त्वाचा असतो, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
पुराव्यांशी प्रामाणिक राहणे आवश्यक
इतिहासाची मांडणी कोणत्याही विचारधारेला अनुसरून नव्हे तर ऐतिहासिक साधनांशी प्रामाणिक राहून करावी लागते, असा टोला त्यांनी डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांना लगावला. आपल्या विचारसरणीला अनुकूल अशा घटनांना महत्त्व देणे किंवा ऐतिहासिक घटनांची मांडणी विशिष्ट विचारसरणीला प्रोत्साहन देईल, अशा प्रकारे करणे हे इतिहासावर अन्याय करणारे आहे, असे विधान त्यांनी केले.