पंतप्रधान मोदी यांचे गुजरातमध्ये प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवसारी
भारताच्या आरोग्य व्यवस्थेत सर्वंकष सुधारणा घडविण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासूनच तसे धोरण आचरणात आणले आहे. समाजाच्या तळागाळातील आणि देशाच्या कानाकोपऱयात वास्तव्य करणाऱया शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्य सेवेचे लाभ पोहोचले पाहिजेत, अशा तऱहेची यंत्रणा आम्ही विकसित करीत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नवसारी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.
शुक्रवारी त्यांच्या हस्ते नवसारी येथील ए. एम. नाईक आरोग्य संकुल आणि निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. ए. एम. नाईक यांच्या विश्वस्त संस्थेने ही रुग्णालये सुरू केली आहेत. गरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा, या उद्देशाने हे आरोग्य सेवा संकुल स्थापन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आरोग्य धोरणामध्ये झालेल्या सुधारणांवर प्रकाश टाकला. गुजरातच्या राज्य सरकार संचालित कर्करोग संशोधन संस्थेच्या आणि कर्करोग रुग्णालयाच्या उपचार क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली असून रुग्णशय्यांची संख्या 450 वरून एक हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे. इतर आजारांवरही अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. सर्वसामान्यांना या सुविधांचा लाभ कोणताही पक्षपात न करता दिला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या हस्ते गुजरातमध्ये अन्य अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. त्यात ‘इस्रो भवन’चाही समावेश आहे. गुजरातमध्ये इस्रोची शाखा स्थापन करून राज्याला अंतराळ संशोधन क्षेत्रातही आघाडीवर नेण्याचे कार्य भाजपचे राज्य सरकार करीत आहे. विकासाच्या सर्व क्षेत्रांमध्ये गुजरात वेगाने घोडदौड करीत आहे, असे प्रतिपादन करीत त्यांनी वीस वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला.