मध्यरात्री नभघुमटाखाली
शांत शिरी तम चवऱया ढाळी
त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती
तेथे कर माझे जुळती
आताच्या पिढीला खूप म्हणजे खूपच जुना वाटेल असा कृष्णधवल चित्रपट ‘पुत्र व्हावा ऐसा’ मध्ये एका शाळकरी मुलाच्या तोंडी असलेलं गाणं. ज्याला जीवनमूल्ये म्हणतात ती शाबूत असण्याचा तो काळ होता. आशाताईंच्या स्वरातलं आणि वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं ऐकता ऐकता खरंच डोळय़ातून अश्रू वाहायला लागतात. यमनच्या असंख्य आविष्कारांपैकी हा एक सुंदर आविष्कार. यमन हा रात्रीच्या पहिल्या प्रहरातलाच राग आहे. अनेक तारकांनी भरलेलं निश्चल आकाश, शांत वातावरण आणि चवऱया ढाळणारा काळोख, मुळात काळोख चवऱया ढाळतो ही संकल्पनाच मोठी सुरेख आहे! आणि कवीने यातच हेही सूचित केले आहे की त्यक्त आणि बहिष्कृत माणसाला अंधार जवळचा वाटतो. त्याचं नाव, त्याचं कर्तृत्त्व हे त्यावेळी काळोखातच बुडालेलं असतं. कुठल्या कुठल्या आठवणी काहूर माजवीत असतात. अपयशाला आणि मोठं व्हायच्या धडपडीला साथी क्वचितच असतात. त्यामुळे एकटय़ाने झगडत दिवस संपल्यावर रात्री भुईला पाठ टेकताना ते सगळं दुःख बाहेर पडतं. हे सगळं चिंतन घडतं ते रात्रीच. म्हणून रात्रही महत्त्वाची असते. मुंबई पुण्यासारख्या किंवा दिल्ली कलकत्यासारख्या शहरात शांतता ही अभावानेच मिळते. खेडय़ातली वर्दळ त्यामानाने लवकर निवते. अंधार पडल्यानंतर हळूहळू दुकानं बंद होत जातात. रस्त्यावरून फिरणाऱयांची संख्या कमी होत जाते. एका एका घरातल्या एकेका माणसाची बोलणी मंद मंद होत जातात. लहानगी पेंगत पेंगत झोपी जातात. उन्हाने गारव्याचा अंगरखा घालावा तसं चांदणं कवडशांनी झाडांमागून, कौलारावरून रांगोळी घालत येतं. शहरात मोठमोठय़ा नियॉन साइन्सच्या झगमगाटात, भगभगत्या अजस्त्र लाइट्सच्या प्रखर उजेडात बापडं जळून जातं. पण कुठेशा एखाद्या घराच्या गॅलरीत जाईजुई किंवा रातराणीच्या नक्षत्रवेली वाकून फुलसडे पाडीत असतात. चांदण्याचा मलमली पडदा त्यावरून गॅलरीत सळसळतो. आणि मग गाणं वाजतं.
तारे निळय़ा नभात हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीत
ओठांतल्या स्वराला का जाग आज आली?
धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली..
अनुराधा हे नक्षत्र आहे हे आपल्याला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांतून पटत असतं. या गाण्याची प्रत्यक्ष सिनेमातली सिच्युएशन वेगळी आहे पण ते ऐकताना एकमेकांच्या प्रेमात असलेली जोडी चांदण्यांची मजा घेत आहे असंच डोळय़ांसमोर येतं. त्यापेक्षाही जरा जास्तच धुंदी असते तेव्हा मग रात्र नशा होऊन येते. कशी माहीत आहे?
लई टिपूर टिपूर ही रात अशी
आली पिरतीचं गानं गात जशी
दोन्ही डोळं मिटून आज आली कुठून?
मला गुलाबी कोडं घाली.
अशी असते ती रात्र. मग ती शहरी मोजकेपणा पार सोडून देते आणि अस्सल मराठमोळय़ा मातीतला रांगडेपणा लेऊन धसमुसळेपणाने आपल्या प्रेयसीला छळणाऱया प्रियकराला आणखीनच धुंदी आणते. पण प्रत्येक रात्र अशी असेल असं नसतं आणि प्रत्येकासाठी ती तशीच असेल असंही नसतं. काही दुर्दैवी जिवांसाठी तीच रात्र जीवघेणी ठरते. ‘हा खेळ सावल्यांचा’ या पिक्चरमध्ये एक भयाण वाटावं असं एक गाणं आहे.
काजळरातीनं ओढून नेला सये साजण माझा
जीव ये भरुनी भिजते पापणी, कधी रे येशील राजा
माडावरून पडून जिचा प्रियकर दगावतो तिच्या तोंडी असलेलं हे गाणं खरं तर घाबरवून सोडतं. रात्रीचं हे असं काळरात्र असणं समोर येतं.
रात्र म्हटलं की अंगाई आलीच. एक गाणं का कोण जाणे पण ऐकल्यावर काहीतरी गमावल्यासारखं रडू येतं. ते म्हणजे सुमन कल्याणपूर यांचं,
आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध घोटाळती ताटव्यात
आली बघ गाई गाई चांदण्याचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल
ज्यांची मुलं मोठी होऊन लांब गेलेली असतात त्या आयांना ही अंगाई ऐकून रडू येतंच असेल. रात्रीचे अप्रतिम आयाम पहायचे असतील तर पुलंच्या लेखनात! रात्री कंदील घेऊन जाणाऱया फकिराच्या आवाजाचं रात्रीशी असणारं अनुसंधान शांतपणे वाचावं. भोवतालची दुपार विसरून जाल. रात्र खरंच वेगळी असते. सगळी कामं आटोपल्यानंतरची वेळ रात्रीची असते. घरी परतण्याची वेळ रात्रीची असते. जिवलगांना भेटण्याची वेळ आणि दिवसभर राबून थकलेल्या जिवाला विसावा देण्याचीही हीच वेळ असते. आपली रात्र हा पलीकडच्या गोलार्धातील दिवस असतो आणि त्यांच्याकडची रात्र हा आपल्याकडे आलेला उजेड होय.
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळे ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय
या गोड गाण्यात रात्रीच्या काळेपणाचं वर्णन काय पण गोड आहे.. रात्रीचा अंधार काळा खरा, पण पाणी आणायची घागरही तशीच काळीभोर. अंगावर घेतलेली बुंथ काळी, हातातली बिलवरही तशीच. म्हणजे या सगळय़ा कृष्णवलयात ती गवळण अशी हरवते की पाण्यालाही एकली जायला घाबरते. परत तिच्याबरोबर असलेली कृष्णाची मूर्ती काळीच.. कृष्ण म्हणजेच काळं. पण कृष्णाच्या असण्याने त्या काळेपणाला देवत्त्वाचा झळाळ चढतो खरा. आणि कृष्णाचं गारुड म्हणजे कधीच न संपणारं.
अपरात्री कुंजवनी सूर मधुर जाग मनी
कळेना सुचेना माझी मी उरेना
सावरेना…
मीलनासी आतुरले
अशी अवस्था एखाद्या राधिकेची झाली तर तो तिचा दोष थोडाच असतो? बरं ही नुसती प्रणयाची रात्र असते म्हणून अशी असते असंही नाही. आता हेच गाणं पहा.
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली
इपरीत खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोशा झाली
पावलं वेंधळी झाली
वाट ही आंधळी झाली
इपरीत खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोशा झाली.
हे म्हणजे भलतंच झालं. संदीप खरेंची ही चांगल्या अर्थाने भलतीच कविता आहे. त्याला संगीतसाजही अफलातून चढवला आहे. रात्र अशीही असते. आणि
राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं नाय
मोडुनी संग हा रंग हा जायाचं नाय नाय नाय नाय
आता इतकी आर्जवी मागणी, तीही अर्ध्या रात्री केलेली असताना कुठला रसिक ती मोडून जाण्याची इच्छा करील?
रात्र म्हणजे मोठ्ठा आडोसा असतो सगळय़ा विश्वासाठीच.
पांघरूण घालण्यासाठी ती येते. कधी ती निळी सावळी होऊन येते. कधी ती रात्रीच्या शहरी झगमगाटात नुसतीच एक वेळ म्हणून येते. कधी काळ म्हणून येणारी ती कधीतरी बाळ होऊनही येते. म्हणून तर कुसुमाग्रज म्हणतात,
कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
उद्या काहीतरी चांगलं घडणार आहे याची आशा रात्र लावते. आपल्या जगाच्या सगळय़ा रेषांना आपल्यात सामावून घेणारी रात्र एकेका रेषेला दर पहाटे क्षितिजावर सोडून देत असते. म्हणून तर रात्र संपताना ‘बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली’ असं होतं. रात्र अशीच असते.
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू