आयएएफ प्रमुखांची माहिती ः संरक्षण दलाची ताकद वाढल्याचाही दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काश्मीर-लडाखमधील युद्धभूमीवर तैनात असलेली सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी ‘मेड इन इंडिया’ लढाऊ वाहने लडाखमधील फॉरवर्ड बेसमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वतः नवीन वाहनांचे सारथ्य करत या लढाऊ वाहनांना लडाखसारख्या कठीण प्रदेशात सहजपणे चालवता येऊ शकते, असे स्पष्ट केले.
इन्फंट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी व्हेईकल्स (आयपीएमव्ही) नावाची वाहने यावषी एप्रिलमध्ये भारतीय लष्कराला देण्यात आली होती. लडाखच्या डोंगराळ भागात या वाहनांची चाचणी घेण्यात आली आहे. ही इन्फंट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी व्हेईकल्स संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व टाटा समूह यांनी संयुक्तपणे विकसित केली आहेत. सदर वाहने एखादी व्यक्ती सहजपणे चालवू शकते. तसेच चालक आपल्यापासून (वाहन) 1,800 मीटर दूरचे दृश्यही पाहू शकतो. वाहनावर बसवलेले शस्त्र आतून नियंत्रित केले जाऊ शकते, अशी माहिती लेफ्टनंट उपेंद्र द्विवेदी यांनी दिली.
शत्रूराष्ट्रावर दबाव ही भारताची नवी रणनीती आहे. जगभरात आता युद्धाचे स्वरुपही बदलत चालले आहे. सायबर, माहिती आणि अंतराळ क्षेत्र ही नवीन युद्धक्षेत्रे म्हणून उदयास येत आहेत. अशास्थितीत भारतीय हवाई दलाला वेगाने विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या काळात आपले धोरणात्मक प्राधान्य आणि कार्ये पूर्ण करणे आवश्यक आहे, असे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
मुत्सद्देगिरी, अर्थव्यवस्था आणि माहिती ही लष्करी उपकरणांशी संलग्नतेची प्राथमिक साधने बनत आहेत. याचा आधारही संरक्षण दलांकडून योग्यपणे घेतला जात आहे. झपाटय़ाने बदलणाऱया आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे आपण साक्षीदार आहोत. या बदलत्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या काळात, आपल्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांचे आणि कृतींचे पुनर्मूंल्यांकन करण्याची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले.