ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जातात असा आरोप शिवसेनेकडून केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी आज प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मातोश्रीवरील ही चर्चा कोणत्या विषयावर होती, याची माहिती मात्र अद्यापपर्यंत समजू शकलेली नाही.
गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात. व्यापार-उद्योग आणि रोजगारीवरून सध्या राज्यात विरोधकांकडून घमासान सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि रोजगार दुसऱ्या राज्यात जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. असं असताना गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
गौतम अदानी हे केंद्र सरकारचे जवळचे उद्योजक आहेत, असे आरोप विरोधकांकडून केले जात असतानाच गौतम अदानी हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी कशासाठी गेले असावेत हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या भेटीमुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा जोरात रंगत आहे. आदानी यांच्या मार्फत काही राजकीय नवे समीकरणं तर तयार होत नाही ना? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.