राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.सुनीलकुमार सिंह यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पृथ्वीच्या वातावरण बदलांचे चक्र समुद्रावरच आधारले आहे. वातावरणातील वाढते तापमान समुद्र पुन्हा-पुन्हा नियंत्रित करत असतो. हे चक्र बिघडले तर बर्फ वितळू लागेल, उष्णता वाढेल आणि जगणे मुश्किल होऊन जाईल, असे सूचक विधान राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंह यांनी केले.
शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे शुक्रवारी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या संस्थांच्या विद्यमाने पहिल्या सागर महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख संचालक नंदकुमार पटवर्धन, संचालक सीए नितीन करमरकर, सीए पुरुषोत्तम पेंडसे, समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. सुनील डामरे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सिंह म्हणाले की, महासागरांनी जगाचा 70 टक्के भाग व्यापला आहे आणि महासागर आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सुमारे 95 टक्के खोल महासागर असे आहेत की, त्यांचा आतापर्यंत शोध लागला नाही. लोह, मॅंगनीज, निकेल आणि कोबाल्ट अशी खनिजद्रव्ये समुद्रात आहेत. 50 टक्के ऑक्सीजन समुद्रातून तयार होतो. कार्बनडाय ऑक्साईडचे नियंत्रण समुद्र करतो. जैवविविधता समुद्रामुळे टिकून आहे. समुद्रातील द्रव्यांचा उपयोग औषधे, कॉस्मेटिक बनवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर केला जातो. मत्स्यखाद्यावर बरेचसे जग अवलंबून आहे. त्यावर अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. दैनंदिन जीवनात आपण समुद्राशिवाय जगू शकत नाही. भारतातील मान्सून समुद्रावर अवलंबून आहे. समुद्र सर्वाधिक महत्वाचे आहेत. पृथ्वीच्या वातावरण बदलांचे चक्र समुद्रावरच आधारले असल्याचे सिंह यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार पटवर्धन यांनी केले. ‘आसमंत’ने गेल्या 11 वर्षांत निसर्ग संवर्धन, विद्यार्थी आणि शास्त्राrय संगीत याविषयीचे अनेक कार्यक्रम केले आहेत. हा पहिला सागर महोत्सव आहे. या माध्यमातून समुद्राविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत. डॉ.गुरुदास नुलकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले की, समुद्र सखा आहे. अनेक धातू, द्रव्ये, सुंदर जैवविविधता, जलचर प्राणी समुद्रात आहेत. विद्यार्थी व समुद्रकिनाऱयावर राहणाऱयांनी आणि सर्वांनीच समुद्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मान्यवरांचा सत्कार पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन नंदकुमार पटवर्धन यांनी केला. आरजे दुहिता सोमण-खेर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी विवांत मुंबईचे डॉ. संजीव शेवडे, कोस्टल कॉन्झर्वेशन मुंबईचे प्रदीप पाताडे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी, संशोधक पुणे, मुंबईसह विविध भागांतून आले आहेत.
छायाचित्र प्रदर्शन पाहण्याची पर्वणी
विवांत अनटेम्ड फौंडेशनतर्फे ‘सागर माझा सखा’ या विषयावर छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनात जलचर, किनाऱयावर आढळणारे छोटे जीव, मासे, प्रवाल आदींची विविध छायाचित्रे झळकली आहेत. हे प्रदर्शन आज 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले राहणार आहे.