दिग्विजय सिंहांना संबोधिले ‘बंटाधार’
वृत्तसंस्था/ इंदोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशच्या मालवा येथून भाजपच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. इंदोर येथे आयोजित भाजपच्या विजय संकल्प कार्यकर्ता संमेलनाला त्यांनी संबोधित केले. शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर 2023 आणि 2024 च्या निवडणुकीतील विजयाचा संकल्प मांडला. यादरम्यान शाह यांनी काँग्रेस अन् विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना करप्शननाथ तर दिग्विजय सिंह यांना श्रीमान बंटाधार असे त्यांनी संबोधिले आहे.
कलम 370 हे काँग्रेसने स्वत:च्या पोटच्या मुलाप्रमाणे अनेक वर्षांपर्यंत जपून ठेवले होते. पंतप्रधान मोदींनी कलम 370 संपुष्टात आणत काश्मीरला भारताशी जोडण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्याचे काम आमच्या सैन्याने केले असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी अहिल्याबाई होळकर यांना नमन करून स्वत:च्या संबोधनास सुरुवात केली. देवी अहिल्यबाईंनी पारतंत्र्य दूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तर पंतप्रधान मोदी हे पूर्ण जगात भारताचे नाव उज्ज्वल करण्याचे काम करत आहेत. मोदी विरोधी लोक कलम 370 संपुष्टात आणण्यास विरोध करत होते. अशा लोकांनी स्वत:च्या आघाडीचे नाव बदलले तरी जनता त्यांना मत देणार नाही अशी टीका शाह यांनी केली आहे.
अयोध्येत रामलल्ला हे तंबूत विराजमान होते. काँग्रेसने मंदिराचे काम रखडविले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदींनी राम मंदिराचे भूमिपूजन केले. अहिल्याबाई होळकर यांच्या नंतर धार्मिक स्थळांचा कायापालट घडविण्याचे काम मोदींनी केले आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ यांचे सरकार दीड वर्षे राहिले. शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने सुरू केलेल्या योजना कमलनाथ यांनी बंद केल्या होत्या. योजनांचा निधी हडपण्यासाठीच कमलनाथ यांनी हे पाऊल उचलले होते. कमलनाथ यांना राज्यात एकही उद्योग आणता आला नाही, परंतु बदल्यांचा उद्योग मात्र यांनी राज्यात राबविला. त्यांनी दीड वर्षांमध्ये राज्याचे मोठे नुकसान केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
कमलनाथ यांनी किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांची नावेच सादर केली नाहीत. शिवराज सिंह यांचे सरकार येताच शेतकऱ्यांच्या नावाची यादी पाठविली. राज्यातील शेतकऱ्यांना सन्मान निधीचे पैसे मिळत असल्याचे शाह म्हणाले.
निवडणूक विजयाचा संकल्प
भाजपला बूथवरील कार्यकर्ताच निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकतो. प्रचंड बहुमतासोबत 2023 मध्ये राज्यात भाजपला सत्तेवर आणण्याचा संकल्प आज (रविवारी) घ्यायचा आहे. 2024 मध्ये राज्यातील लोकसभेच्या सर्व 29 जागांवर भाजपला विजयी करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. या संमेलनाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही संबोधित केले आहे.
काँग्रेसमुळे राज्याची अधोगती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत विकसित अन् समृद्ध होत आहे. आज पूर्ण जग मोदी मोदीचा मंत्र जपत आहे. काँग्रेसने स्वत:च्या शासनकाळात राज्याचे नुकसान केले. कमलनाथ यांच्या शासनकाळात विकासाचे कुठलेच काम झाले नाही. कमलनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या योजना रोखण्याचे पाप केले आहे. पंतप्रधान गृह योजना राज्यात लागू करण्यास त्यांनी नकार दिला. कमलनाथ यांनी भाजप सरकारच्या योजना बंद केल्या होत्या. मुलांकडून लॅपटॉप हिरावून घेतल्याचा आरोप शिवराज यांनी केला आहे.