…तर राजीनामा देण्यास तयार : कुलगुरु नियुक्तीचा मुद्दा
वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. कुलगुरुंच्या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेपाचे एक उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारचे एक देखील उदाहरण सादर केल्यास मी राज्यपालपदाचा राजीनामा देईन असे आव्हान आरिफ मोहम्मद खान यांनी दिले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना पदांवर नियुक्त करण्यासाठी कुलगुरुंच्या विरोधात कारवाई करत असल्याचा आरोप विजयन यांच्याकडून वारंवार केला जात आहे. माझ्या अधिकाराचा वापर करत कुठल्याही व्यक्तीला पदावर नियुक्त केल्याचे दाखवून दिल्यास राजीनामा देईन. केरळच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय राज्यात तस्करीला संरक्षण देत असल्याचा प्रतिआरोप राज्यपालांनी केला आहे.
मी कधीच कुठल्याही निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप केला नाही, परंतु सर्वप्रकारच्या तस्करी कारवायांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून संरक्षण दिले जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसलेले लोक कन्नूर विद्यापीठच्या कुलगुरुला स्वतःच्या अपात्र तसेच अयोग्य नातेवाईकांना नियुक्त करण्याचा आदेश देत आहेत असा दावा राज्यपाल खान यांनी केला आहे.
राज्य सरकार, मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय तस्करीच्या कारवायांमध्ये सामील आहेत. अशा स्थितीत निश्चितपणे माझ्यासमोर हस्तक्षेप करण्याची संधी आहे. केलेले आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यास विजयन यांची राजीनामा देण्याची तयारी आहे का असे प्रश्नार्थक विधान आरिफ मोहम्मद खान यांनी केले आहे.