देवीच्या सदरचे यादवकालीन बांधकाम
कोल्हापूर /सौरभ मुजुमदार,
करवीर निवासिनी श्री अंबाबाई आदिशक्ती, आदिमाता, सर्वसाद्या जिच्या वास्तव्याने करवीर क्षेत्राला दक्षिणकाशी म्हणतात. देवीचा पालखी सोहळा संपन्न झाल्यावर तसेच ज्या ज्या वेळी देवी आपले गर्भगृह सोडून बाहेर पडते. त्या त्यावेळी तो सोहळा पूर्ण झाल्यावर पुन्हा गर्भगृहात जाण्यापूर्वी देवी गरुड मंडपातील सदर सिंहासनावर विराजमान होते. एखाद्या सार्वभौमत्व राजदरबाराप्रमाणेच ती कदाचित यावेळी आपल्या भक्तांची जणू गाऱहाणीच त्या ठिकाणी ऐकत असते.
साधारणतः प्रत्येक पुरातन मंदिरासमोर अशी दगडी पाषाणातील सदर आपणास पहावयास मिळते. परंतु जगदंबेच्या या सदरेवरती दर्शनी बाजूवरच देवीकडे मुख करून तिच्या पुढे हात जोडून नमस्कार करून उभारलेल्या दास गरुड देवतेची मूर्ती फारच कमी भक्तांना माहिती असेल. याच सदरेवरती लाकडी भक्कम, अशा उंच खांब असणारा, अत्यंत कोरीव नक्षीदार छताची बांधणी असणारा, वास्तुशास्त्राचा अद्भूत नमुना असणारा भव्य असा लाकडी मंडप इ.स. अठराव्या शतकात साधारणतः १८३८ते १८४२ या दरम्यान करवीर संस्थानाचे खासगी कारभारी दाजी कृष्णा पंडित यांनी जगदंबे चरणी साकारला. हाच तो गरुड मंडप होय.
अनेक अभ्यासकांनी देवीची ही पाषाण रुपी सदर इ.स.१८ व्या शतकामध्ये सम्राट राजा सिंघणदेव याने बांधलेली आहे असे सांगितलेले आहे. याच राजाने आपल्या चाकरामार्फत देवीसमोर एक विशाल तोरण (सध्याचे भव्य महाद्वार) बांधल्याचा महत्त्वपूर्ण शिलालेख सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरात आपणास आजही पहावयास मिळतो. यामध्ये सिंघणदेव राजाने देवीस उत्तम आभूषणे, रत्नालंकार अर्पण केल्याची नोंद आहे. तसेच याच राजाची स्तुती देखील आहे. सम्राट सिंघणदेव राजाच्या बिरूदावलीमध्ये श्रीमंत महाराजाधिराज, प्रौढप्रताप चक्रवती, कुलकमलकलिका, विकास भास्कर, सुवर्ण गरुड ध्वज, विवेक विद्याधर. .. असा समावेश असून अशा प्रकारच्या भूषणावह बिरूदावली मंदिर परिसरातील शिलालेखांमध्ये आजही आढळतात.
यादवकालीन या राजाचे राजचिन्ह अथवा राजध्वज हे गरुड देवताच असल्यामुळे या सदरेच्या बांधणीमध्ये गरुड देवतेची मूर्ती केलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोणार येथील होयसाळ राजांचे राजचिन्ह असणाऱया मंदिराला जशा दगडी पायऱया आहेत त्याच बांधकामाची जुळणाऱया पायऱया याच गरुड मंडपाच्या दर्शनी भागावर पहावयास मिळतात.
रथशैली या वास्तु प्रकारानुसार बांधलेल्या या सदरेला दोन्ही बाजूस रथाची पाषाण चक्रे कोरलेली असून पायरीवर चढताना दोन्ही बाजूला पाषाणांमध्ये व्याल कोरलेलेही आपण पाहतो. व्याल म्हणजेच गज व शार्दुल (ऐन तारुण्यातील बलवान सिंह) यांचे एकत्रित रूप होय. हेच व्याल सुवर्ण पालखीच्या दांडय़ाला दर्शनी बाजूस आपण आजही पाहू शकतो. ज्याच्याकडे शौर्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. जगदंबेच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणारी ही गरुड मंडपाची वास्तू व तिचे महत्त्व अमूल्य असेच आहे.करवीर महात्म्यमध्ये उल्लेख केल्यानुसार साक्षात जगदंबेने सर्पांना आपल्या भूमीत अभय दिलेले असून त्यामुळेच या अभयाचे व मैत्रीपूर्ण प्रतिक म्हणून गरुडांच्या प्रतिमेवर सर्पांची आभूषणे आहेत. हीच मूर्ती गरुड मंडपाच्या या सदरेवर आहे. शतकानुशतके ज्या सदर सिंहासनावर गरुड मंडपामध्ये देवी विराजमान होते हा गरुड मंडप आजही लाखो भक्तांसाठी पूजनीयच आहे.
दिव्य मंडप म्हणजे जगदंबेच्या दरबाराची जागा
दक्षिण भारतीय मंदिर शैलीतील वैशिष्टय़ असणाऱया सदर या शिल्पविशेषाभोवती उभारलेला हा लाकडी भव्य दिव्य मंडप म्हणजे जगदंबेच्या दरबाराची जागा आहे हंडय़ा, झुंबरे यांनी नटलेला हा गरूड मंडप करवीर संस्थांनच्या शाही वैभवाची आजही आठवण करून देतो.
ऍड. प्रसन्न मालेकर, मंदिर व मूर्तीशास्त्र अभ्यासक.