12 टक्केहून अधिक शिक्षक पदे रिक्त असतानाही कार्यमुक्तीच्या हालचाली; जिह्यातील 64 शिक्षकांची मागवली माहिती; रिक्त पदांची संख्या पुन्हा वाढणार
कृष्णात चौगले कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 7 हजार 851 मंजूर पदांपैकी 6 हजार 879 शिक्षक सध्या कार्यरत आहेत. तब्बल 990 रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत असताना शिक्षण विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. बारा तालुक्यातून 64 शिक्षकांकडून आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्यासाठी कागदपत्रे मागवली आहेत. वास्तविक शासन निर्णयानुसार 10 टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. पण जिह्यात 12 टक्केहून अधिक पदे रिक्त असताना देखील शिक्षण विभागाकडून आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच् अट्टाहास सुरु आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. ज्या शाळेत 5 शिक्षक पदे मंजूर आहेत, तेथे केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. जिह्यातील मराठी माध्यम शाळांमध्ये 972 तर उर्दू माध्यम शाळांमध्ये 18 अशी एकूण 990 पदे रिक्त आहेत. शिक्षण हक्क कायद्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे, सर्व शाळाबाहय मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, गुणवत्ता वाढवणे, स्थलांतरीत व हंगामी स्थलांतरीत मुलांच्या पर्यायी शिक्षणाची सोय करणे आदी बाबींचा समावेश आहे. पण हे शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी जि.प.शाळांतील पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाही सुरु केली आहे.
कार्यमुक्तीसाठी शिक्षकांकडून कागदपत्रांची पुर्तता
बदली प्रक्रियेसाठी जिह्यातील 64 शिक्षकांकडून शासकीय येणे-देणे नसल्याचा दाखला, खातेनिहाय चौकशी सुरु अथवा प्रस्तावित नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, न्यायप्रविष्ट प्रकरणात वादी, प्रतिवादी नसल्याचे प्रमाणपत्र, सेवेतील मूळ नेमणूकीचा आदेश, सेवेत नियमित केल्याचा आदेश आदी कागदपत्रे 26 ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषदेकडे देण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱयांमार्फत संबंधित शिक्षकांना कळवले होते. त्यानुसार सर्व शिक्षकांनी कागदपत्रांची पुर्तता केली असल्याचे समजते.
शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची ‘गडबड’ कशासाठी
शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार ज्या जिह्यांमध्ये 10 टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, अशा जिह्यातील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शिक्षक भरती झाल्यानंतरच कार्यमुक्त करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच कोकण विभागातील जिह्यांतून अन्यत्र आंतरजिल्हा बदली झालेल्या अनेक शिक्षकांना गेले तीन वर्षे कार्यमुक्त केले नसल्याचे समजते. पण कोल्हापूरमध्ये 12 टक्केहून अधिक पदे रिक्त असताना शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची गडबड का सुरु आहे ? त्यामध्ये काय ‘अर्थ’ दडला आहे ? असा सवाल शिक्षण वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
शैक्षणिक गुणवत्तेवर होणार परिणाम
शासनाकडून शिक्षक भरती झाली नसल्यामुळे कोल्हापूर जिह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषतः शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांमध्ये रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे तेथील लोकप्रतिनिधींकडून जि.प. प्रशासनाकडे नेहमीच तक्रारीचा सूर असतो. अशा परिस्थितीत शाहूवाडी तालुक्यातील 17, पन्हाळा 8, हातकणंगले 3, शिरोळ 1, करवीर 7, गगनबावडा 2, राधानगरी 6, कागल 2, भुदरगड 5, आजरा 3, चंदगड 8, तर गडहिंग्लज तालुक्यातील 2 अशा जिह्यात एकूण ऑनलाईन आंतरजिल्हा बदली झालेल्या 64 शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे जिह्यातील रिक्त पदांच्या संख्येत पुन्हा वाढ होणार असून शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.