आसाम बनतेय ’जिहादी’ कारवायांचे केंद्र
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममधील बोंगाईगाव जिल्हय़ातील एका संशयित दहशतवाद्याला भारतीय उपखंडातील अल-कायदाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. राज्य पोलिसांनी गेल्या आठवडय़ात अटक केलेल्या तीन जणांच्या चौकशीदरम्यान उघड झालेल्या माहितीच्या आधारे संशयिताला पकडण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुस्लीम तरुणांना कट्टरपंथी बनवल्याचा आणि गेल्या तीन-चार वर्षांत जिहादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या या चौथ्या दहशतवाद्याच्या अटकेनंतर राज्यातील वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱयांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य ‘जिहादी’ कारवायांचे केंद्र बनत असल्यासंबंधी चर्चा झाली. तसेच संशयित दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त आणि तपासणी करण्याची सूचना करण्यात आली.