कृष्णात चौगले,कोल्हापूर
Kolhapur Heavy Rain Update Balinge bridge News : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील (भोगावती नदीवरील) बालिंगे पूल मंगळवारपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.हा पूल कमकुवत झाल्यामुळे वाहतूक बंद केली असल्याची सर्वत्र चर्चा आहे.पण 2016 साली महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर बालिंगे पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडीट केले होते त्यानुसार हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे भक्कम आणि सुरक्षित आहे.पण सद्यस्थितीत भोगावती नदीचे पाणी पुलाच्या (स्प्रींज लेवल (कमान) पर्यंत) आल्यामुळे पाण्याचा मोठा दाब पडत आहे.अशा परिस्थितीत पुलावरून वाहतूक सुरु ठेवल्यास धोकादायक ठरू शकते.त्यामुळे सदरची पाणीपातळी ‘स्प्रींज लेवल’पासून किमान दीड ते दोन फुटांनी कमी होईपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.त्यानंतर वाहतूक पुर्ववत सुरु होणार आहे.
बलिंगे पूल हे ब्रिटीशकालीन (1885 सालातील) आहे. या पूलाचे दगडी बांधकाम आहे.सद्यस्थितीत पूराचे पाणी हे दगडी कमानीजवळून वाहत आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. राधानगरी धरण काही तासांत शंभर टक्के भरणार असून सुमारे साडेसात हजार क्युसेक विसर्ग सुरु होणार आहे. कुंभी आणि कोदे ल.पा.मधूनही विसर्ग सुरु आहे.त्यामुळे बुधवारी दुपारनंतर भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे पुलावर पुन्हा पाण्याचा दाब वाढणार आहे.याची गंभीरपणे दखल घेऊन सोमवारी चालू ,बंद असणारी वाहतूक राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मंगळवारपासून पूर्ण बंद केली आहे.पाण्याची पातळी धोका पातळीपासून खाली आल्यानंतर म्हणजेच कमानीच्या खाली दीड ते दोन फुटांनी गेल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु होणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे.
दोनवडे बाजूकडील भरावामुळे पूलावर पाण्याचा दाब
आजतागय दोनवडे कडील बाजूचा रस्ता पाण्याखाली गेल्यानंतरच कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद नैसर्गिकरित्या बंद होत होती.या रस्त्यावर पाणी आल्यानंतरच बालिंगे पुलाच्या कमानीजवळून पाणी वाहत होते.पण यावर्षी दोनवडेकडील बाजूच्या रस्त्यावर पाणी आले नसतानादेखील पाणी पूलाच्या कमानीजवळ पोहोचले आहे.याबाबत पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्या कारणांचा शोध घेतला असता बालिंगे पूलाच्यानजीक काही अंतरावर गेल्या दोन वर्षात मोठा भराव पडला आहे.या भरावामुळे पूर आल्यानंतर नेहमी दोनवडेकडील बाजूकडून वाहणाऱ्या पाणाच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाला आहे.परिणामी पाण्याचा दाब बालिंगे पूलावर पडत आहे.
सुरक्षित पर्यायी मार्गांचा अभाव
बालिंगे पुलावरून वाहतूक बंद झाल्यामुळे गगनबावडाकडून येणाऱ्या वाहनधारकांसाठी दोन पर्यायी मार्ग आहेत.यामध्ये कोपार्डे येथील जनावरांच्या बाजारापासून पडळ फाटा,यवलूज,निटवडे,वरणगे-पाडळी,चिखली,आंबेवाडीमार्गे कोल्हापूरला येणे शक्य आहे.पण सध्या या मार्गावरील प्रयाग-चिखली दरम्यानच्या रस्त्याशेजारीच पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे सुमारे एक ते दीड फूटांनी पाणीपातळी वाढल्यास हा मार्ग बंद होऊ शकतो.तसेच गगनबावडाकडून कोल्हापूरला येण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे कळे,पुनाळ,दिगवडे,माळवाडी,कोतोलीमार्गे आसुर्ले-पोर्ले येथे तेथून कोल्हापूरला येणे शक्य आहे. पण या मार्गावरून माळवाडी येथे रस्ता खूप अरुंद असल्यामुळे अवजड वाहतूक करणे अशक्य आहे. त्यामुळे बालिंगे पूल बंद झाल्यानंतर प्रवासासाठी एकही सुरक्षित पर्यायी मार्ग नसल्याचे चित्र आहे.अशा परिस्थितीत तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज भासल्यास संबंधित रुग्णास कोल्हापूरपर्यंत पोहोचवायचे कसे ?असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पाणीपातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक होणार सुरु
बालिंगे हे ब्रिटीशकालीन दगडी पूल आहे. या पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडीट झाले असून तो वाहतुकीसाठी भक्कम आणि सुरक्षित आहे.पण पुल कमकुवत झाल्यामुळेच वाहतूक बंद केली असल्याची अफवा पसरली आहे. सद्यस्थितीत स्प्रींज लेवलपर्यंत असणारी पाणीपातळी किमान एक ते दीड फुटांनी कमी झाल्यास वाहतूक पुर्ववत सुरु केली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
कृष्णात मुधाळे,कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग