कोल्हापूर / प्रतिनिधी
महापूर पट्ट्यातील पिकांचे प्रत्येकवेळी कोट्यवधी रूपयांचे नुकसान होते. नुकसान भरपाईसाठी सरकारने महापूर बाधीत होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये तातडीने समावेश करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह गेल्या काही वर्षात पाच मोठे महापूर येऊन शेतकऱ्यांचे अब्जावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. सन २०१९ व २०२१ च्या महापुरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या महापुराते अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गतवर्षी नुकसान होऊन देखील राज्य सरकारने अतिशय तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऊस, भात, सोयाबिन, केळी, तसेच भाजीपाला ही पिके प्रामुख्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बागायती पट्ट्यामध्ये घेतली जातात. वेळोवेळी आलेल्या महापुराच्या तडाख्याने ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होतात. सदर पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्यात यावा.
उसाला एकरी १ लाख, सोयाबिन ५० हजार, केळी २ लाख, आदी सर्व पिके तसेच भाजीपाला वरील नुकसान भरपाईची तरतूद यामध्ये करून पीक विम्यामध्ये नुकसान भरपाईची तरतूद करण्यात यावी. जी काही विम्याच्या हप्त्याची रक्कम असेल ती रक्कम शेतकरी भरण्यास तयार आहेत. या पीक विम्यामुळे सरकारला नुकसान भरपाई देताना कोणताही बोजा पडणार नाही. तसेच शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
महापुरामुळे वेळोवेळी नुकसान भरपाई होणे आता शेतकऱ्यांना अजिबात परवडणारे नाही. महापूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून महापूर पट्ट्यातील सर्व पिकांचा पीक विम्यामध्ये समाविष्ठ करावा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.