सीबीआयने केला नाही जामिनाला विरोध
वृत्तसंस्था/ पाटणा
रेल्वेमधील लँड फॉर जॉब्स म्हणजेच जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळय़ाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मीसा भारती यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या राउज ऍव्हेन्यू न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी आता 29 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
लालू यादवांना व्हिलचेअरवरून न्यायालयात आणले गेले होते. यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांपासून अंतर राखले होते. न्यायालयाने 27 फेब्रुवारी रोजी लालू यादव तसेच त्यांच्या पत्नीसह 14 आरोपींना समन्स बजावला होता. समन्स जारी होण्यापूर्वी सीबीआयने लालू यादवांची दिल्लीत तर राबडीदेवींची पाटण्यात चौकशी केली आहे. सीबीआयकडून 5 महिन्यांपूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
2004-2009 या कालावधीत रेल्वेमंत्री असताना लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेत नोकरी मिळवून देण्याकरता उमेदवारांकडून जमिनी मिळविल्याचा आरोप आहे. लालू यादवांच्या कुटुंबाला या जमिनी भेट म्हणून देण्यात आल्या होत्या किंवा अल्प दरात विकल्या गेल्या होत्या. रेल्वेच्या ग्रूप-डी भरतीमध्ये नियमांचे उल्लंघन करत अनेक जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या असा आरोप आहे.
तपासात मध्य रेल्वेच्या अनेक अधिकाऱयांचे नाव समोर आले आहे. यात जीएम तसेच सीपीओ स्तरीय अधिकारी देखील सामील आहेत. या अधिकाऱयांनी नोकरी देण्याच्या बदल्यात स्वतःच्या निकटवर्तीयांच्या नावावर जमिनींची नोंदणी करविली आहे. तर नोकरी मिळविणाऱया उमेदवार संबंधित पात्रता पूर्ण करत नव्हते. तर अनेक उमेदवारांची कागदपत्रे देखील बनावट आहेत असे आरोपपत्रात नमूद आहे.