प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : शहरालगतची आठ गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्याच्या हालचाली राज्य शासनाकडून सुरू आहेत.पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बैठक घेतली आहे.यामुळेच राज्य शासन आठ गावांसह हद्दवाढीसाठी सकारात्मक असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन 50 वर्ष झाली तरी कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही.शहरवासिय यासाठी आंदोलन करत आहेत. परंतू प्रस्तावित गावातील ग्रामस्थांचा असणारा विरोध आणि तेथील राजकीय नेत्यांची सोयीची भूमिका यामुळे हद्दवाढीचा निर्णय झालेला नाही.
1946 पासून आतापर्यंत शहराचे क्षेत्र 66.82 चौ.मी इतकेच आहे. यामध्येच ब्ल्यू लाईन, रेडलाईन, आरक्षणमुळे 25 ते 30 स्के. कि.मी जागा व्यापारी असून येथे कोणतेही विकासकामे अथवा बांधकामे करता येत नाही. शहरातील विकासकामांना मर्यादा आल्या आहेत. पर्यटकांसह जिल्ह्यातून हजारो नागरीक शहरात येतात. यामुळे पार्कींग व्यवस्थेसह मनपाच्या अन्य सेवावरही परिणाम होत आहे.यामुळेच हद्दवाढीची मागणी जोर धरत आहे.कोल्हापूर शहर हद्दवाढ समितीकडून हद्दवाढीसाठी पुन्हा आंदोलन सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनीही हद्दवाढ झाली तरच शहराचा विकास होणार असल्याचे सांगत हद्दवाढीचे संकेत दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची मागील आठवड्यात मंत्रालयात बैठक झाली.यामध्ये महापालिकेने 20 गावांचा पाठविलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली.पहिल्या टप्प्यात शहरलगतची आठ गावे घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे.या आठ गावात विकासकामे करून दुसऱ्या टप्प्यात इतर गावांचा समावेश हद्दवाढीत केला जाऊ शकतो.
हद्दवाढीसोबत भरीव निधी मिळणार
केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत.सध्या क्षीरसागर शहरातील विकासकामांसाठी निधीचा सपाटा लावला आहे.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार ही हद्दवाढीच्या बाजूने आहेत.त्यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे.याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे हद्दवाढ झाल्यास त्यांच्याकडून विकासकामांसाठी भरीव निधी मिळणार आहे.यानिधीत शहरासह हद्दवाढीतील गावांमध्ये विकास साधता येणार आहे.यानंतर उर्वरीत गावेही हद्दवाढीत येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हद्दवाढीतील प्रस्तावित 8 गावे
कळंबा,पाचगांव,मोरेवाडी,उचगांव,मुडशिंगी,गांधीनगर-वळीवडे,सरनोबतवाडी,शिंगणापूर