जगन्नाथ मुळवी /मडकई
वैद्यकीय विज्ञान कितीही प्रगत असले तरी दुर्दैवाचे पाश आवळणाऱया नियतीपुढे मात्र ते कधी कधी थिटे पडत असते. याचा अनुभव मानव जातीला पदोपदी येत असतो. ढवळी येथील 29 वर्षीय युवक महानंद गजानन सतरकर याच्या वाटय़ाला आलेल्या व्यथेने कुणाचेही अतःकरण हेलावून जाईल. पण कलेच्या माध्यमातून त्याने या कठिण परिस्थितीवर मात करीत आपले जीवन सार्थकी लावले आहे. कलेच्या क्षेत्रात थक्क करणारे योगदान व त्याचे जगणे आज इतरांसाठी प्रेरणा बनून राहिले आहे.
महानंदच्या हसत्या खेळत्या निरागस आयुष्यावर अवघ्या बाराव्या वर्षी एका दुर्धर आजाराने आघात केला. फोंडा येथील आल्मेदा हायस्कूलमध्ये महानंद सतरकर इयत्ता सातवीत शिकत होता. अचानक एका रात्री त्याचा पाठीचा कणा दुखू लागला व असाध्य आजाराने त्याच्या कमरे खालचा भाग विकलांग झाला. कपिलेश्वरी येथील डॉ. कपिलेश्वरकर यांच्याकडे त्याला नेण्यात आले. तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. तिथेही औषधोपचारांती काहीच निष्पन्न होत होऊ शकले नाही. पुढे मुंबईतील हिंदूजा व लिलावती इस्पितळात चौदा दिवस त्याच्यावर डॉ. रामाणी व डॉ. उदानी यांनी औषधोपचार केले पण हाती काहीच लागत नव्हते. खेळण्या बागडण्याच्या वयात महानंदच्या जीवनात भयाण अंधार पसरत होता….
वैद्यकीय क्षेत्रात औषधोपचार करताना पाच वर्षे अक्षरशः वाया गेली. शैक्षणिकदृष्टय़ा अतोनात नुकसान झाले. असहाय्य जीवन जगणाऱया महानंदाने 17 व्या वर्षात पदार्पण केले आणि असहाय्य बनलेले हे शरीर म्हणजेच मी नव्हे. माझ्यातला अनादीअनंत असलेला आत्मा जो पर्यंत या शरीरात वास करून आहे, तो पर्यंत नियतीशी लढेन, हा जणू त्याने निर्धाराच केला. आपल्यातील सुप्त कलेला जागृत करीत ‘क्लेफ्ट’ या लघुपटाची निर्मीती करून त्यांनी जीवनात एक नवीन पाऊल टाकले. गोवा एन्टरटेनमेन्ट सिंडीकेट ढवळी फोंडा ही संस्था स्थापन करून स्व. ग्रहेश रायकर, अभिषेक नाईक व सागर नाईक यांच्या अनमोल सहकार्यातून कोकणी लघुपटांची निर्मीती करताना संपादनही केले. सिनेस्टार नागराज मंजुळे यांची मुलाखत पाहून महानंदला या क्षेत्रात काम करण्याची स्फुर्ती व चेतना मिळाली…..
महानंद आपल्या कला क्षेत्रातील या प्रवासाबद्दल सांगतात. एक क्षण सुद्धा मागे वळून न पाहता एकेक लघुपटांची निर्मिती करीत गेलो. 2013 साली बेळगांव आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘दुक’ या लघुपटाची निर्मिती करून सहभागी झालो. तर गोवा एन्व्हारमॅन्टल फिल्म महोत्सवात ‘फुडार’ हा लघुपट घेऊन गेलो व त्यात पहिले पारितोषिक प्राप्त झाले. रहस्य, आकूर, मुखोवटो अशा कित्येक लघुपटांची निर्मिती केली. ‘भय’ ही मालिका प्राईम या चॅनलमध्ये 16 भागातून प्रदिर्शीत करण्यात आली. 2014 साली गोवा युवा महोत्सवात ‘प्लॅटोनिका, तथास्तु व दायज’ हे निर्मित केलेले माहितीपट दाखविण्यात आले. या माहितीपटांना प्रथम पारितोषिके मिळाल्या नंतर गोवा युवा महोत्सवात ‘कावळय़ाची शाळा’ हे व्हीडिओ गीत सादर करून द्वितीय पारितोषिक मिळविले. कला क्षेत्रातील या प्रवासाने महानंद सतरकर सुखावून जात असतो. आतापर्यंत त्यांनी 200 कविता लिहिल्या आहेत. नियतीपुढे न झुकता त्यांनी त्यांचे कार्य निरंतरपणे सुरू ठेवले आहे. स्वतःच्या दुःखातच आनंद मानून कलेच्या क्षेत्रातील दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोव्याचे ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, संपादक, नाटय़कर्मी स्व. विष्णू सूर्या वाघ यांनी महानंद सतरकरची दखल घेतली होती. राजीव गांधी कलामंदिरच्या उपाध्यक्षपदी असताना स्व. वाघ यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला होता. ‘हे कपिलेश्वर’ हे भक्तीगीत श्री कपिलेश्वरावर लिहून त्याची ध्वनी चित्रफित नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यूटय़ुबवर त्याला 25 हजार लाईकस् मिळाले आहेत. नुकतेच या ध्वनी चित्रफितीचे अनावरण वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सरपंच राजेश कवळेकर व देवस्थानचे अध्यक्ष उद्योजक देवेंद्र ढवळीकर यांच्या उपस्थितीत झाले. गेल्या 17 वर्षांत महानंदने एका कठीण परिस्थितीवर मात करीत जगण्याचा नवीन तंत्र व मंत्र शोधलेला आहे. औषधोपचारांबरोबरच फिजिओथेरपीही तो घेत आहे. त्यामुळे एका सकारात्मक ऊर्जेने तो जगत आहे. नियतीने आवळून धरलेले त्याचे हे पाश आई विजया व काका खुशाली यांच्या कठोर प्रयत्नांती निश्चितच तुटतील आणि महानंद सतरकर एका मोकळय़ा वातावरणात स्वच्छंदीपणे विहार करेल…..!