उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. वराळे यांचे प्रतिपादन : जेएमएफसी आवारातील नूतन इमारतीचे उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वत:वर आत्मविश्वास ठेवून सतत प्रामाणिकपणे काम करत रहा. त्यामुळे निश्चितच यश मिळेल. वकील क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काम करणे महत्त्वाचे आहे. वकील हे समाजाचे आदर्श आहेत. तेव्हा महिलांचा मानसन्मान करत काम करावे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीबरोबर स्वत:ची प्रगतीदेखील होते. वकील क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने समाजाचा आदर करावा, असे आवाहन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. बी. वराळे यांनी केले.
येथील जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच त्याच इमारतीवर दुसऱ्या मजल्यावरील कोनशीला कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. वकिलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन या क्षेत्रात प्रवेश केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या आजोबांचे जवळचे संबंध तसेच ते आमचे नातेवाईक. त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रभाव आमच्या संपूर्ण कुटुंबावर पडला असल्याचे ते म्हणाले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ असे घोष्यवाक्य आहे. त्याचपद्धतीने बेटा पढाओदेखील झाले पाहिजे. त्यामुळे कुटुंब सुसंस्कृत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. शिक्षणामुळे आपली परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी शिक्षणाला जीवनात अत्यंत महत्त्व आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने हृदयापासून काम करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वकिलांनी जास्तीत जास्त पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पैशाच्या मागे न लागता तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, पैसा तुमच्या पाठिशी लागेल, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य जनता वकिलांना देव मानते. त्यामुळे त्यांना नाराज करू नका, असेदेखील यावेळी स्पष्ट केले. वकिली क्षेत्रामध्ये नव्याने प्रवेश केलेल्या तरुणांना ज्येष्ठ वकिलांनी मार्गदर्शन करून काम करण्यास सहकार्य करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा यामध्ये स्वार्थ असू नये, असे त्यांनी सांगितले.
सैनिक म्हणून काम करा
सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात त्या प्रमाणे वकील आणि न्यायाधीशांनी संयुक्तपणे काम करून सैनिक बनणे काळाची गरज आहे. कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बाहेरच्या व्यक्तीचा अधिक हस्तक्षेप होत आहे, ही बाब अत्यंत धोकादायक आहे. वकिलांनी हा हस्तक्षेप थांबविण्यासाठी सैनिकांप्रमाणे कणखर काम करण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि बेळगाव जिह्याचे प्रशासकीय न्यायाधीश बी. विराप्पा यांनी व्यक्त केले.
न्यायालयीन खटल्यांमधील 40 टक्के खटल्यांमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे केवळ 60 टक्के कामावरच वकिलांना अवलंबून राहावे लागत आहे. ही बाब समाजाच्यादृष्टीनेही घातक आहे. वकिलांनी आपल्या पक्षकाराला न्याय देण्यासाठी प्रबळपणे काम करावे. जेणेकरून जे 40 टक्के परस्पर खटले निकालात जात आहेत, ते खटले न्यायालयीन प्रक्रियेत येतील, असे सांगितले.
वकिलांनी समाजाचे दु:ख ओळखले पाहिजे. दु:खी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही. 60 वर्षांपासून अनेक खटले प्रलंबित आहेत. यामुळे न्यायालयाबद्दल समाजाच्या मनामध्ये दुरावा आहे. तो दूर होणे गरजेचे आहे. कोणतेही खटले अधिक काळ प्रलंबित न ठेवता ते निकालात काढणे महत्त्वाचे आहे. काम करा, तुम्हाला पैसा शोधत येईल. मात्र, काम केला नाही तर तुमच्यापासून पैसा दूर जाईल. हे लक्षात ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे.
सरकार न्यायालयीन व्यवस्थेसाठी कोट्यावधी रुपये दरवर्षी खर्च करत असते. कारण समाजातील काहींवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठीच हा खर्च केला जातो. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करून काम करावे, असे न्यायाधीश बी. विराप्पा यांनी सांगितले.
ग्रामीण भागापर्यंत कायदा काय आहे हे पोहोचणे गरजेचे आहे. सध्या सर्वात दु:खदायक गोष्ट म्हणजे आपण मोठे झाल्यानंतर आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. अशा वेळी पैसा बघू नका तर त्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचा गांभीर्याने विचार करा आणि आरोपींना शिक्षा होण्यास सहकार्य करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनीही आपले विचार व्यक्त केले.
नूतन इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन मगदूम, न्यायाधीशा के. एस. हेमलेखा, न्यायाधीश अनिल कट्टी, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, आमदार महादेवाप्पा यादवाड, कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. विनय मांगलेकर, रामदुर्ग बार असोसिएशचे अध्यक्ष आर. जी. वज्रमट्टी, सेक्रेटरी ए. ए. मुदकवी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय अभियंता एस. एस. सोरबत, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्नट्टी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्ताफा हुसेन एस. ए. यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी जी. एन. पाटील यांनी आभार मानले.