अरुणाचल प्रदेशातील दुर्घटना, घातपाताचा संशय
इटानगर / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरनजीकच्या नाहरलागून डेली बाजारपेठेला लागलेल्या भीषण आगीत 700 हून अधिक दुकानांची राखरांगोळी झाली आहे. ही दुर्घटना मंगळवारी पहाटे साधारण 4 वाजता घडली. या आगीत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पहाटेची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे जीवीत हानी टळली. ही आग फटाक्यांमुळे किंवा दिवाळीसाठी लागलेल्या दिव्यांमुळे लागली असावी असा संशय आहे. मात्र्, घातपाताची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
आग लागल्याचे वृत्त समजताच त्वरित आग विझविण्याची यंत्रणा कामाला लागली होती, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र बहुतेक दुकाने बांबू आणि लाकडापासून बनविलेली असल्याने आग झपाटय़ाने पसरली. काही दुकानांमध्ये असलेल्या गॅसच्या सिलिंडर्सचाही आगीने स्फोट झाल्याने आगीत भरच पडली.
अनेक तास प्रयत्न
आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाने किमान बारा तास प्रयत्न केल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. आगीचे तीन बंब बराच काळ पर्यंत तेथे होते. आता आग विझली असून प्रशासनाच्या वतीने हानीची व्याप्ती मापण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीमुळे शेकडो कुटुंबे निराधार झाली आहेत.
दुकानदारांचा आरोप
आगीच्या ज्वाळा दिसू लागल्यानंतर त्वरित काही दुकानदारांनी नजीकच्या अग्नीशमन दलाच्या केंद्राकडे धाव घेतली. मात्र त्यावेळी या केंद्रात त्यांची तक्रार घेण्यासाठी कोहीही उपलब्ध नव्हते. काही काळानंतर कर्मचारी उपस्थित झाले. मात्र, बंबांमध्ये पाणी नव्हते असे लक्षात आले. त्यामुळे आग विझविण्यास विलंब झाला. म्हणून मोठय़ा प्रमाणात वित्त हानी झाली असा आरोप दुकानदारांनी केला.
चौकशीचा आदेश
या दुर्घटनेची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. इटानगरचे पोलीस महानिरीक्षक जिमी चिराम यांनी ही दुर्घटना अपघाताने घडल्याचा दावा केला. घातपाताची शक्यता त्यांनी फेटाळली असली तरी त्याही दिशेने तपास केला जाणार आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे खरे कारण समजू शकेल. तो पर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे पोलिस अधिकाऱयांनी स्पष्ट केले.