पुणे / प्रतिनिधी :
Monsoon’s return journey begins गेले साडेतीन महिने देशात मुक्काम ठोकलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासास मंगळवारपासून सुरुवात झाली. दक्षिणपश्चिम राजस्थात तसेच लगतच्या कच्छच्या भागातून मान्सून माघारी फिरला आहे. सर्वसाधारपणे 17 सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. यंदा मात्र तीन दिवस उशिरा परतीस सुरुवात झाली आहे.
जून महिन्यात देशात दाखल झालेला यंदा जोरदार बरसला असून, सरासरीच्या 6 टक्क्यांहून अधिकच्या पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. मंगळवारी दक्षिणपश्चिम राजस्थान व कच्छच्या भागातून मान्सून माघारी फिरला. या भागात निर्माण झालेली ऍन्टी सायक्लोन स्थिती, गेल्या पाच दिवसांतील कोरडे हवामान व पावसाचा अभाव आदी वैशिष्टय़े मान्सूनच्या परतीची मानली जात आहेत. बिकानेर, जोधपूर, नलिया अशी परतीच्या मान्सूनची रेषा आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस
ओरिसा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवरील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हे क्षेत्र पश्चिम उत्तरपश्चिमेकडे दोन दिवसांत सरकणार असून, याच्या प्रभावामुळे मध्य भारतातील अनेक जिल्हय़ांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पाऊस
विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ाच्या अनेक भागांत पुढील तीन दिवस कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.