मिलिटरी महादेव – नानावाडीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणीच पाणी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मिलिटरी महादेव परिसरात नानावाडी रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे. या समस्येचे निवारण करण्याबाबत महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. या समस्येमुळे वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाचा जोर वाढला की शहरातील विविध भागात पाणी साचण्यास सुरुवात होते. विशेषतः नानावाडी परिसर आणि नानावाडीकडे जाणाऱया रस्त्यावर पाणी साचून वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो. मिलिटरी महादेवपासून नानावाडीच्या प्रवेशद्वारावर ठिकठिकाणी रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचते. रस्त्याशेजारी असलेल्या नाल्याची स्वच्छता केली नसल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहते. ही समस्या दरवषीची बनली असून, समस्येचे निवारण करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. वास्तविक नाल्याची स्वच्छता करून साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना राबविल्यास ही समस्या निर्माण होऊ शकत नाही. मात्र अधिकाऱयांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. याचा फटका वाहनधारक आणि रहिवाशांना बसत आहे.
जिल्हाधिकाऱयांनी समस्येकडे लक्ष द्यावे
सदर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, पावसाचे पाणी साचून रहात असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. ही समस्या वाहनधारकांना जीवघेणी बनल्याने समस्येचे निवारण करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण याबाबत कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. रस्त्यावर सतत पाणी वाहत असून, समस्येचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱयांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.