15 ऑक्टोबरपासून प्रारंभ : महानगरी मुंबापुरीशी दररोज कनेक्ट : खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश : स्टार एअरकडून वेळापत्रक जाहीर
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरकरांसाठी गुड न्यूज आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते मुंबई या हवाई मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअरने या दररोजच्या विमानसेवेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर झाले. आठवड्यातील सर्व दिवस ही विमानसेवा सुरू राहणार असल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यासह कोकणातील प्रवाशांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरच्या औद्योगिक, पर्यटन, शेती आणि शैक्षणिक जगताचा महानगरी मुंबापुरी अर्थात मुंबईशी कनेक्ट वाढणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणारी दैनंदिन विमानसेवा असावी यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशिल होते. त्यांचा पाठपुरावाही सुरू होता. त्याला आता यश आले आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून कोल्हापूर – मुंबई हवाई मार्गावर रोज विमानसेवा सुरू होत आहे. या विमानसेवेचा नजिकच्या काळात कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यांच्या विकासात महत्वाचा वाटा असेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. ते कोल्हापूरच्या नागरिकांची बहुतांश कामे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत असतात. शासकीय काम असो वा व्यवयास, उद्योग आणि उच्च न्यायालयातील कामे असो, त्यासाठी मुंबईला जावे लागते. आता दररोजच्या विमानसेवेमुळे ही कामे सुलभपणे होणार आहेत. त्याचबरोबर शारिरीक आणि मानसिक त्रास वाचणार आहे. वेळेचीही बचत होणार आहे. कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या पाहता दररोज विमानसेवा अत्यावश्यक होती. त्यासाठी माझे केंद्र सरकारमधील मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि विमान सेवा देणारी स्टार एअरचे प्रमुख संजय घोडावत यांच्याशी चर्चा सुरू होती. सातत्याने पाठपुरावाही सुरू होता. घोडावत यांनी फ्लाईट उपलब्ध करून दिल्या. केंद्रीय स्तरावर सर्व परवानगी मिळाल्याने आता 15 ऑक्टोबरला विमानसेवा सुरू होते. त्यातून केवळ मुंबई नव्हे तर संपूर्ण भारताशी कनेक्टीव्हीटी लाभणार आहे.
कोल्हापूर-मुंबई दैनंदिन विमानसेवेचे वेळापत्रक असे
सकाळी 9 वाजून 05 मिनिटांनी बेंगळूरहून कोल्हापूरकडे विमान उ•ाण घेईल आणि 10 वाजून 20 मिनिटांनी हे विमान कोल्हापूरला येईल. त्यानंतर सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान, मुंबईला 11 वाजून 50 मिनिटांनी पोचेल. तर दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान कोल्हापुरात 4 वाजून 40 मिनिटांनी पोचेल. त्यानंतर हे विमान 5 वाजून 10 मिनिटांनी बेंगळूरला रवाना होईल.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवेमुळे केवळ कोल्हापूरकरांनाच लाभ होणार नाही तर देशातील कोणत्याही राज्यातील प्रवासी अंबाबाई दर्शन असो वा पर्यटन असो अथवा इतर कोणतेही काम असो, मुंबईत येऊन तेथून थेट कोल्हापूरला येऊ शकणार आहे. आपल्या देशाची कनेक्ट करणारी ही विमानसेवा असणार आहे.
-खासदार धनंजय महाडिक