‘हर घर तिरंगा’ सोहळा ः ध्वज आचारसंहिता नियमात केंद्र सरकारकडून बदल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आता प्रत्येकजण आपल्या घरात रात्रं-दिवस तिरंगा फडकवू शकतो. केंद्रातील मोदी सरकारने स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा फडकवण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यापूर्वी जनतेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती. ‘हर घर तिरंगा’ सोहळय़ात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृह सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा स्वातंत्र्यदिन ऐतिहासिक बनवण्यासाठी गेल्या एक वर्षापासून देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध पद्धतीने जनजागृती केली जात आहे. त्याला अनुसरूनच येत्या 15 ऑगस्टला सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 13 ते 15 ऑगस्टदरम्यान लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी 20 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याची भाजपची योजना आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट करत राष्ट्रध्वजाशी संबंधित माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या ट्विटवर अनेक प्रश्न विचारले आहेत.
ऐतिहासिक माहिती केली शेअर
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रध्वजाचे छायाचित्र आणि त्यासंबंधीची माहिती पोस्ट केली आहे. यावषी आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. चला तर मग प्रत्येक घरात तिरंगा मोहिमेला बळ देऊया. ‘हर घर तिरंगा’ चळवळ बळकट करूया. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आपापल्या घरांमध्ये तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी विविध राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात तिरंगा फडकवण्याचे नवे नियम जारी केले. त्यांनी पत्रातील नवीन नियमांबाबत भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्याचे म्हटले आहे. नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत. राष्ट्रध्वज कोणत्याही मोकळय़ा जागेवर किंवा घरात फडकत असेल तर आता तो दिवस-रात्र फडकवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या नियमानुसार जेव्हा राष्ट्रध्वज एखाद्या मोकळय़ा जागेवर फडकवला जातो तेव्हा तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवला जात होता.