प्रतिनिधी/खानापूर
गणेशचतुर्थीनिमित्त शांतता व सुव्यवस्था रहावी, यासाठी खानापूर पोलिसांनी शहरात पथसंचलन केले. यावेळी जिल्हा उपनिरीक्षक शिवानंद कट्टगी यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले. यावेळी खानापूर, नंदगड तसेच राखीव पोलीस दलाची तुकडी या पथसंचलनात सहभागी झाली होती.
जिल्हा राखीव पोलीस दलाचे पोलीस प्रमुख काशपन्नावर, राखीव पोलीस दलाचे अधिकारी सी. डी. तावराप्पा, नंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्याप्पा माळगोंड, खानापूर पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी, उपनिरीक्षक शरणेश जालीहाळ यासह इतर पोलीस कर्मचारी या पथसंचलनात सहभागी झाले होते. सोमवारी बाजारात गणेचतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठ तुडूंब भरलेली असताना त्यात पोलीस पथसंचलनामुळे नागरिकांत कुतुहल तसेच थोडी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे बाजारावर थोडा परिणाम झाला होता. पथसंचलनानंतर बाजार पुन्हा सुरळीत सुरू झाला.